वाचन संस्कार, ग्रंथ व्यवहारातूनच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडते : ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
वाचन संस्कार, ग्रंथ व्यवहारातूनच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडते : ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
वाचन संस्कार, ग्रंथ व्यवहारातून वाचन संस्कृती वाढते. त्यातून विद्यार्थ्यांची अभ्यासू वृत्ती खऱ्या अर्थानं विकसित होते. पुस्तके ही केवळ ज्ञानाची साधने नसून ती व्यक्तिमत्त्व घडविणारी प्रेरणास्थाने आहेत. नियमित वाचनातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य जीवन साळोखे यांनी केले.
हणमंतवाडी हायस्कूल, हणमंतवाडी (ता. करवीर) येथे आयोजित गुरुपौर्णिमा, ग्रंथप्रदर्शन उद्घाटन, ग्रंथभेट, गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि ‘लेखक आपल्या भेटीला’ अशा संयुक्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक के. एस. पोतदार होते. प्रमुख उपस्थिती राजेंद्र पाटील (चेअरमन, को. जि. मा. शि. पतसंस्था, कोल्हापूर), पी. डी. पाटील (उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ) हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य जीवन साळोखे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शन उद्घाटनाने झाली. ग्रंथप्रदर्शनामध्ये शालेय ग्रंथालयातील पुस्तकांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती, ज्याचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्राचार्य साळोखे यांनी आपल्या ‘ग्रंथदान’ उपक्रमांतर्गत प्रशालेस सुमारे चार हजार रुपये किमतीचा दर्जेदार पुस्तकांचा संच भेट, ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ रंगनाथन यांची प्रतिमा भेट देऊन विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा दिली. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे. कोजिमाशि पतसंस्था चेअरमन राजेंद्र पाटील यांनीही शालेय ग्रंथालयास संदर्भ ग्रंथ भेट देताना, गुरुचे महत्त्व अधोरेखित करत “गुरु हेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे दीपस्तंभ आहेत.” असे प्रतिपादन केले. तसेच पी. डी. पाटील यांनी संविधानाची प्रत भेट देऊन गुरुचे समाजनिर्मितीतील स्थान अधोरेखित केले.
प्रारंभी ज्येष्ठ शिक्षक जे. एस. पोतदार यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्राचार्य साळोखे यांच्या गेली वीस वर्षे अखंड सुरू असलेल्या ग्रंथदान उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. मुख्याध्यापक श्री. के. एस. पोतदार यांनी प्रशालेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व गुणवत्तापूर्ण वाटचालीचा आढावा घेतला.
“लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमात प्राचार्य जीवन साळोखे यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत, वाचनाची सवय, पुस्तकांचे महत्त्व, साहित्याचे जीवनातील स्थान आणि यशस्वी आयुष्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यासाची गरज यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून या संवादाचा लाभ घेतला.आपल्या मनोगतात प्राचार्य जीवन साळोखे यांनी गुरु आणि ग्रंथ यांचे जीवनातील महत्त्व स्पष्ट करत सांगितले की, “गुरु मार्गदर्शन करतो तर ग्रंथ ज्ञानाचा अखंड स्रोत असतो. गुरु-ग्रंथ यांच्या संगतीतूनच विद्यार्थ्यांचे खरे व्यक्तिमत्त्व घडते, असे सांगून वाचन, शिस्त आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांचे महत्त्व स्पष्ट केले._
कार्यक्रमाचा समारोप एस. के. थोरात यांनी केला. या कार्यक्रमास प्रशालेचा सर्व स्टाफ, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुपौर्णिमेच्या पार्श्र्वभूमीवर आयोजित या संयुक्त उपक्रमाचे विद्यार्थी – पालकावर्गातून स्वागत होत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





