*सर्व क्षेत्रात होणाऱ्या प्रदुषणास वाचनाची उपेक्षा हे प्रमुख कारण – ग्रंथदान कार्यक्रमात जीवन साळोखे यांचे प्रतिपादन*
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*सर्व क्षेत्रात होणाऱ्या प्रदुषणास वाचनाची उपेक्षा हे प्रमुख कारण – ग्रंथदान कार्यक्रमात जीवन साळोखे यांचे प्रतिपादन* 
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, इचलकरंजी
सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रदूषणास समाजातील जबाबदार घटकांकडून वाचनाची होणारी उपेक्षाच प्रमुख कारण आहे. शालेय ग्रंथालये, ग्रंथ व्यवहार, योग्य वाचन यांच्याकडे समाजाचे होणारे दुर्लक्ष सध्याच्या सामाजिक भांबावलेपणास आणि गोंधळास कारणीभूत ठरत आहे. वाचन प्रोत्साहन आणि शालेय ग्रंथालय समृद्धीसाठी ग्रंथदान उपक्रम एक सामाजिक अभियान म्हणून शाळाशाळांतून राबवले पाहिजे. तरच वाचन प्रेरणा दिन साजरे करण्यास अर्थ प्राप्त होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांनी केले.
ते आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत इचलकरंजीमधील वीस माध्यमिक शाळांना ग्रंथभेट देताना बोलत होते. इचलकरंजी शहर मुख्याध्यापक संघ व शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खंजिरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुणराव खंजिरे होते. प्रमुख पाहुणे प्रशासनाधिकारी अजयकुमार बिरणगे, जि.प. शिक्षण खात्याचे अधिक्षक प्रविण फाटक उपस्थित होते.
यावेळी शहरातील वीस माध्यमिक शाळांना प्राचार्य जीवन साळोखे यानी आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत ४०० दर्जेदार, वाचनीय पुस्तकांचे तसेच प्रत्येक हायस्कूलना ग्रंथालय शास्त्राचे जनक डाॅ.एस.आर. रंगनाथन यांचा फोटो, वाचनसंस्कृती वृध्दीसाठी प्रोत्साहन देणारे सन्मान चिन्ह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
प्रारंभी स्वागत मुख्याध्यापक बी.ए.को॓ळी यांनी, प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे लोकल ऑडिटर इरफान अन्सारी यांनी केले. वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक संघाचे संपर्क प्रमुख अशोक हुबळे यांनी प्रमुख पाहुणे जीवन साळोखे यांचा परिचय करून दिला आणि त्यांच्या ग्रंथदान उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी बोलताना जीवन साळोखे म्हणाले, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची ओढ आणि आवड निर्माण झाली पाहिजे.त्यासाठी शिक्षक अधिक वाचते झाले पाहिजेत. मराठी राजभाषा दिन, वाचन प्रेरणा दिन हे केवळ उत्सवी स्वरु पात, भाषणबाजी करून किंवा कागदावर साजरे होवून चालणार नाही. ग्रंथदानासारखे उपक्रम प्रत्यक्षात राबवून, विद्यार्थ्यांसह पालकामध्ये वाचनाचे महत्त्व रुजवले पाहिजे. फक्त वाढत्या मोबाईल वापराला दोष देऊन उपयोग नाही. असे सांगून सध्या विद्यार्थ्यांसह सर्वच वयोगटातील तरूण वर्गात नेहमीच्या बोलण्यात, व्यवहारात ज्या शिवराळ, अर्वाच्य भाषेचा वापर सर्रास केला जातो, तो अत्यंत चिंताजनक आहे. तो रोखण्याची मोहीम सर्वांनी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पुस्तक आणि वाचनाचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी अनेक दाखले देत श्रोत्यांना अंतर्मुख केले. यावेळी रोहन सोशल फौंडेशनच्या वतीने संभाजीराव माने हायस्कूलचे ग्रंथपाल किरण सुतार यांचा “आदर्श ग्रंथपाल” दोन हजारांची पुस्तके, सन्मानचिन्ह, रंगनाथन यांचा फोटो, शाल- हार देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी मनपाचे प्रशासनाधिकारी अजयकुमार बिरनगे यांनी ग्रंथदान उपक्रमाचा पुरस्कार करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढण्यासाठी शिक्षकांनी अधिक वाचते होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अरूणराव खंजिरे यांनी असा उपक्रम इचलकरंजीत प्रथमच होत असल्याचे सांगून सर्व शाळाशाळांतून ग्रंथदान उपक्रम राबवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.संगीता बिरनाळे यांनी करून समारोपही केला.
कार्यक्रमास सर्व संबंधित शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक सर्वश्री बी.ए.कोळी, इरफान अन्सारी, अशोक हुबळे आदींनी परिश्रम घेतले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





