जंगल व घाटक्षेत्रात पर्यटकांनी आनंद घेतानाच निसर्ग संवर्धन व प्राण्यांची काळजी घेण्याचे ‘वर्ल्ड टीम नेचर’चे आवाहन
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
जंगल व घाटक्षेत्रात पर्यटकांनी आनंद घेतानाच निसर्ग संवर्धन व प्राण्यांची काळजी घेण्याचे ‘वर्ल्ड टीम नेचर’चे आवाहन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
सध्या सुट्ट्यांचे दिवस असल्यामुळे बरेचशे लोक पर्यटनाचे नियोजन करत आहेत. त्यात ३१ डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात व बाहेर पर्यटनस्थळी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या तर खूपच वाढलेली आहे. आंबा, फोंडा, आंबोली, करूळ, तिलारी, चोरला या घाटातील वर्दळ देखील वाढलेली आहे. बरेच पर्यटक हे आपल्या खाजगी गाड्या घेऊन प्रवास करत आहेत. यावेळी भरधाव पर्यटकांच्या वाहनाखाली येऊन जंगली प्राणी ठार होत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी आनंद घेतानाच निसर्गसंवर्धन व प्राण्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन वर्ल्ड टीम नेचरने केले आहे.
कोकणात येणाऱ्या व जाणाऱ्या सुसाट गाड्याखाली बरेच महत्वाचे व दुर्मिळ सर्प, ससे, इंडियन सिवेट, भेकर, शेकरू खार, वाघाटी मांजर, रानकोंबड्या, पक्षी या सारखे दुर्मिळ प्राणी गाड्याखाली चिरडून मरत आहेत. तसेही हे ‘रोडकिल’ चे प्रकार नेहमीच होत असतात, पण या दिवसात याची संख्या खूपच वाढलेली आहे.
गेल्या आठवड्यापासून थंडी पडल्यामुळे सकाळच्या प्रहरात सगळी माती, रानं व आजूबाजूचा परिसर थंड पडलेलं असतो. अशावेळी जशी जशी उन्हाची कोवळी किरणं पडू लागतात त्यावेळी उन्हामुळे उबदार झालेल्या दगडावर बसून ऊन घेणाऱ्या जीवांना डांबरी रस्त्यावर येण्यात जीवाला असलेला धोका कळत नाही. त्यामुळेच साप, ससे, सरडे, बेडूक, लहान सहान सरपटणारे प्राणी व इंडियन सिवेट, शेकरासारखे महत्वाचे प्राणी यांसारखे कित्येक जीव हजारोंच्या संख्येने चिरडले जात आहेत.
जैवविविधतेने नटलेला, सदाहरित जंगले, किल्ले, पशुपक्षी यांचे आश्रयस्थान असलेला हा आपला रांगडा सह्याद्री. इथले पशु पक्षी व सरपटणारे प्राणी म्हणजे सह्याद्रीचा जीव की प्राण आहेत.
पण गेल्या कित्येक वर्षाअखेरीस जे पहायला मिळत ते खरंच माणूस नावाच्या बुद्धिमान प्राण्याला लाजिरवाणे नक्कीच आहे. या सर्वाला कारणीभूत आहेत ते बेदरकारपणे गाड्या चालविणारी आणी आपल्याच धुंदीत रॅश ड्राइविंग करणारी लोकं. किमान एक जागरूक नागरीक म्हणून आपण सर्वजण योग्य ती काळजी घेऊया व जंगल व घाट क्षेत्रात आपल्या गाड्या दिलेल्या मर्यादित वेगात चालवून गाडीखाली येणाऱ्या जीवांचे जीव वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न करूया.
अचानक वेगाने गाडीखाली आलेल्या प्राण्यांचा जीव वाचविणे आपल्या हातात नसते हे मान्य आहे, पण तरीही वाहन चालवताना रस्त्यामध्ये समोर एखादा सरपटणारा प्राणी किंवा इतर लहान जीव दिसले की वाहनांचा वेग आपण नक्कीच कमी करू शकतो, हे आपल्या हातात नक्कीच आहे.
रस्ते हे माणसांच्या आयुष्याला गती देण्यासाठी निर्माण झालेत हे मान्य आहे पण यात इतर जीवांची पण हानी होऊ लागली आहे. घराकडं कुणीतरी वाट बघत असेल म्हणून भरधाव गाडी हाकणारे आपण या प्राण्यांना जेव्हा चिरडतो तेव्हा त्यांच्याही घरात, घरट्यात कुणीतरी वाट बघत असेल हे सोईस्कर विसरतो. रस्ते, वाहने हे सर्व आपलीच निर्मिती आहे त्यामुळे आपल्या सह्याद्रीतील वन्यजीव संपत्ती वाचवणे देखील आपलीच जबाबदारी आहे.
त्यामुळे वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. काय होतंय त्याला “मेला तर मेला प्राणी गाडीखाली, त्यात काय एवढं” हा attitude सोडून द्यायला हवा. आणी सर्वांनी मिळून या सह्याद्रीचा जैविक वारसा जपायला हवा. असे आवाहन वर्ल्ड टीम नेचरने केले आहे.
…………………………..
कोट –
जंगल व घाटक्षेत्रात मर्यादित वेगात वाहने चालवून वाहनाखाली येणाऱ्या जीवांचे जीव जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. निसर्ग व प्राणीसंवर्धन करून आनंद लुटूया.
– श्री. अभिजित वाघमोडे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, वर्ल्ड टीम नेचर
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





