राधानगरी विधानसभा मतदार संघात मतदान जनजागृती कार्यक्रम (स्वीप) उत्साहात सुरु : तालुका प्रशासनासह प्राथमिक व माध्यमिक शाळांकडून प्रभावी अंमलबजावणी
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
राधानगरी विधानसभा मतदार संघात मतदान जनजागृती कार्यक्रम (स्वीप) उत्साहात सुरु : तालुका प्रशासनासह प्राथमिक व माध्यमिक शाळांकडून प्रभावी अंमलबजावणी

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २७२ राधानगरी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन १६ एप्रिल ते २० एप्रिल २०२४ या कालावधीत करण्यात आले होते. गारगोटी येथील क्रांती चौकात लोकशाही मॅरेथॉन, मानवी साखळीच्या प्रसंगी तीन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्याचे अनेक स्तरावर प्रयत्न करण्यात आले. ‘जनतेचे राज्य’ ही संकल्पना स्वीकारून जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य चालविले जात आहे. योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे. यादृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्विप कार्यक्रम राबविला जातो.
यामध्ये सायकल रॅली, मानवी साखळी, पथनाट्य, शाळा – महाविद्यालयात निबंध, चित्रकला, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा, याव्दारे निवडणुक विषयक मतदार जागृती करणे, शाळेतील मुलांनी पालकांना पत्र लिहून मतदान करणेविषयी मतदान हक्काविषयी जागृत करणे. शाळा- महाविद्यालयामध्ये निवडणुक विषयक सेल्फी पॉईंट उभारणे, सोशल मिडीया डे – फेसबुक, व्हाट्सअप व इंन्स्टाग्राम अकाऊंट वरुन निवडणुक विषयक व्हीडीओ, ऑडीओ व इतर माहितीव्दारे निवडणुक विषयक मतदार जागृती करणे, मागील लोकसभा निवडणुकीमध्ये ५० टक्केपेक्षा कमी मतदान झालेल्या गावांमध्ये विशेष मोहीम घेऊन मतदान विषयक जागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, दाट लोकवस्तीच्या ठिकाणी मतदान जनजागृती विषयक पत्रके वाटणे, मतदानासाठी प्रोत्साहन देणारी भित्तीपत्रके लावणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करणेत आले होते.
जागृत मतदार हे देशाचे भविष्य असल्याने मतदार स्वयंप्रेरणेने मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत आला पाहिजे, यासाठी प्रशासकीय पातळीवर मतदार जागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
आपल्या देशाचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपला इच्छित लोकप्रतिनिधी निवडून देण्याची संधी मतदारांना दर पाच वर्षांनी मिळते. या संधीचा फायदा सर्व मतदारांनी घ्यावा. या निवडणुकीत राधानगरी विधानसभा मतदार संघातील मतदार आपल्या मतदानाचा १०० टक्के हक्क बजावतील, असा विश्वास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वसुंधरा बारवे यांनी व्यक्त केला.
सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राधानगरी तहसिलदार श्रीमती देशमुख, भुदरगड तहसिलदार श्रीमती अर्चना पाटील प्रयत्नशिल आहेत. या स्वीप कार्यक्रमाचे नोडल ऑफीसर म्हणून राधानगरी व भुदरगडचे गटशिक्षणाधिकारी श्री. दीपक मेंगाणे काम पाहत आहेत.
या निमित्ताने तालुक्यात १६ एप्रिल रोजी सोशल मीडिया डे, सेल्फी पॉईंट, १८ एप्रिल पालकांना पत्र लिहिणे, १९ एप्रिल प्रभातफेरी, चित्रकला, पोस्टर, वक्तृत्व स्पर्धा तर २० एप्रिल पालक सभा, सायकल रॅली, लोकशाही मॅरेथॉन, मानवी साखळी आदी कार्यक्रम राबविण्यात आले.
गारगोटी येथील क्रांती चौकात लोकशाही मॅरेथॉन, मानवी साखळीच्या प्रसंगी कु. शेळके हिने भाषण सादर केले. श्री. शाहू कुमार भवन व गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधनपर पथनाट्य सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषवाक्याचे बॅनर व घोषवाक्यातून मतदार जनजागृती करण्यात आली.
यावेळी गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, शिक्षण विस्तार अधिकारी उत्तम पाटील, केंद्रप्रमुख संजय कुकडे, गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, श्री. शाहू कुमार भवनचे मुख्याध्यापक डॉ.एस.बी.शिंदे, श्री. मौनी महाराज (बनारस) हायस्कूलचे मुख्याध्यापक एन.जी.कांबळे, श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्या सौ.आर.बी.पाटील, डॉ. डी. वाय. पाटील मराठी कॉन्व्हेंट स्कुलचे मुख्याध्यापक शिवाजी वळिवडे, श्री. आबिटकर इंग्लिश स्कुलचे प्राचार्य तुकाराम माने यांच्यासह शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





