मुख्याध्यापक पदासाठी १०० पटसंख्या गृहीत धरून पद मान्य केले जाणार : शिक्षणमंत्र्यांसमवेत संच मान्यतेच्या निकषावर सकारात्मक बैठक संपन्न
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
मुख्याध्यापक पदासाठी १०० पटसंख्या गृहीत धरून पद मान्य केले जाणार : शिक्षणमंत्र्यांसमवेत संच मान्यतेच्या निकषावर सकारात्मक बैठक संपन्न
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुंबई
१५ मार्च २०२४ च्या संचमान्यता नवीन निकषात बदल करुन मुख्याध्यापक पदासाठी १५० पट संख्येऐवजी १०० पटसंख्या गृहीत धरून मुख्याध्यापक पद मान्य केले जाईल तसेच मुख्याध्यापक पद रद्द झाल्यास त्या पदाला संबंधित मुख्याध्यापक सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा पटसंख्या वाढ होईपर्यंत संरक्षण दिले जाईल, अशी दुरुस्ती करण्याचे निर्देश शिक्षणमंत्री नामदार दिपक केसरकर यांनी दिले.
१५ मार्च २०२४ च्या संचमान्यता नवीन निकषातील दुरुस्तीबाबत जवाहर बाल भवन, मुंबई येथे शिक्षणमंत्री नामदार दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्याध्यापक महामंडळाचे कार्याध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुख्याध्यापक पदाचे निकष व मुख्याध्यापक पदास सेवानिवृत्त होईपर्यंत संरक्षण यासाठी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर मुख्याध्यापक पदासाठी १५० पट संख्येऐवजी १०० पट संख्या गृहीत धरून मुख्याध्यापक पद मान्य केले जाईल, तसेच मुख्याध्यापक पद रद्द झाल्यास त्या पदाला संबंधित मुख्याध्यापक सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा पटसंख्या वाढ होईपर्यंत संरक्षण दिले जाईल, अशी दुरुस्ती करण्याचे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी दिले. पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर व नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे यांनी चर्चेत सहभाग घेऊन आवश्यक सूचना केल्या.
माझ्या कार्यकाळात आपल्या अनेक मागण्या मी मान्य केल्या आहेत परंतु शाळेची गुणवत्ता हे प्रत्येकाचे पहिले कर्तव्य असावे अशी अपेक्षा शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली.
या बैठकीत संचमान्यतेच्या इतर निकषावर चर्चा होऊन, सध्या अस्तित्वात असलेली पदे टिकविण्याचे निकष वेगळे असतील व वाढीव पद मिळण्यासाठीचे निकष वेगळे असतील हे मान्य करण्यात आले. संचमान्यता दुरुस्तीचे प्रलंबित प्रस्ताव ऑगस्ट अखेर निकाली काढण्याचे, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रीय कार्यालयात प्रलंबित असलेले शालार्थ आय डी मिळण्याचे प्रस्ताव योग्य असल्यास तात्काळ मंजूर व्हावेत याबाबत सुचना निर्गमित करण्यात येतील असे आयुक्त श्री. सूरज मांढरे यांनी सांगितले. आर टी ई नियमाचे उल्लंघन न होता शिक्षक पदे मंजूर करावी याबाबत मुंबईचे शिक्षक आमदार अभ्यंकर यांनी मागणी केली.
या बैठकीत १५० ऐवजी १०० पटाच्या विद्यार्थी संख्येला मुख्याध्यापक पद ग्राह्य धरणार, यापुढे मुख्याध्यापक पदास सेवा संरक्षण मिळणार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी मानधनात वाढ होणार, पोषण आहार मानधनात वाढ होणार, येत्या दोन दिवसात शिक्षकेतर कर्मचारी संच मान्यता होणार, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटीबाबत सुनावणी दरम्यान सकारात्मक निर्णय घेणार आदी निर्णय घेण्यात आले.
या बैठकीला राज्याचे आयुक्त मांढरे, शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी, संचालक (माध्यमिक) सूर्यवंशी, उपसचिव तुषार महाजन, तसेच मुख्याध्यापक महामंडळाचे प्रतिनिधी माजी अध्यक्ष आदरणीय जे के पाटील व डॉ.रवींद्र निकम उपस्थित होते. जे.के.पाटील यांनी आपल्या युक्तीवादातून 4.1 व 4.2 मध्ये कशी विसंगती आहे व मुख्याध्यापक पद कसे अतिरिक्त ठरते व त्याच शाळेतील उपमुख्याध्यापक पदास मात्र सरंक्षण आहे. याचा अर्थ त्रुटी आहे. यावर मंत्री महोदयांनी दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. सदर सभेला इतर अधिकारी सुद्धा उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा
