विनाअनुदानित शिक्षकांचे आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरु : पुढील आठवड्यात निर्णय घेण्याचे शिक्षणमंत्री ना.दीपक केसरकर यांचे खासदार धैर्यशील माने यांना आश्वासन
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
विनाअनुदानित शिक्षकांचे आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरु : पुढील आठवड्यात निर्णय घेण्याचे शिक्षणमंत्री ना.दीपक केसरकर यांचे खासदार धैर्यशील माने यांना आश्वासन
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
वाढीव टप्पा अनुदानाचा आदेश काढावा, जाचक संचमान्यतेचा आदेश रद्द करावा, यासह विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विनाअनुदानित शाळा कृती समितीचे गेल्या २८ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. सोमवारपासून या शिक्षकांकडून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या परिसरात या समितीतर्फे धरणे आंदोलन सुरू आहे. रोज वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण, त्याची दाद शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे आता आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
दरम्यान आज तिसऱ्या दिवशी खासदार धैर्यशील माने यांनी उपोषणकर्त्यांची आणि शिक्षकांची भेट घेतली. तात्काळ त्यांनी मंत्रालय, मुंबई येथील अधिकारी यांना फोन करून याबाबत माहिती घेतली. तसेच शिक्षणमंत्री नाम.दिपक केसरकर यांना फोन करून जी आर बाबत माहिती घेतली यावेळी शिक्षणमंत्री महोदयांनी पुढील आठवड्यात हा निर्णय होईल असे सांगितले.
यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले, मी स्वतः या प्रकरणी पाठपुरावा करत आहे, सरकार शिक्षकांबाबत सकारात्मक असून येत्या काही दिवसातच याबाबतचा शासन निर्णय निघेल. यापूर्वीही मी शिक्षणमंत्र्यांना याबाबत विचारलेले आहे. त्यांनीही येत्या काही दिवसात शासन निर्णय काढणार आहे असे मला सांगितले आहे. जोपर्यंत जी आर बाबत निर्णय होत नाही तोपर्यंत मी स्वतः याचा पाठपुरावा करीन असे सांगून शिक्षकांना आश्वस्त केले.
अर्थ विभाग घालतोय खोडा
पावसाळी अधिवेशनात विविध विभागाच्या सभागृहात अनेक घोषणा झाल्या. त्याचे शासन निर्णय तात्काळ पारित झाले. त्यासाठी त्यांना अर्थ खात्यातून निधीही मिळाला. परंतु शिक्षकांचा वाढीव टप्प्याचा आदेश १२ जुलैला सभागृहात घोषणा होऊनही अद्यापही निघालेला नाही. प्रत्येक टप्प्याला आम्हाला असा संघर्ष करावा लागतो. कधीही विना आंदोलन टप्पा मिळालेला नाही. शासनाच्या अर्थ विभागातील काही अधिकारी त्रुटी काढून नेमका आमच्याच बाबतीत खोडा घालतात असे आंदोलनकर्ते खंडेराव जगदाळे यांनी खासदारांना सांगितले. दरम्यान जोपर्यंत शासन निर्णय काढून आम्हाला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे या समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे यांनी सांगितले. या उपोषणाला कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, संदीप भोरे, नेहा भुसारी, रेश्मा सनदी हे सोमवारपासून उपोषणाला बसले आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे,राजेंद्र माने, केदारी मगदुम, भानुदास गाडे, सावंता माळी, राजू भोरे ,जयदीप चव्हाण, शिवाजी गायकवाड, अविनाश पाटील, अरविंद पाटील, ओमकार संकपाळ, उत्तम जाधव जनार्दन दिंडे शिवाजी खापणे सचिन आंबी एस एम जाधव सुनील शेंडे,दादासो बंडगर, भाग्यश्री राणे रेखा संकपाळ अमृता देवकाते विद्या पुजारी नीता सुतार उलफत शेख आदी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा
