ज्ञानप्रबोधिनी विशेष : गोविंद के.पाटील तथा जी.के.सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त..!
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
ज्ञानप्रबोधिनी विशेष : कविवर्य गोविंद के.पाटील तथा जी.के.सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त..!
लेखन – श्री.रवींद्र शिवाजी गुरव
कोनवडे (ता.भुदरगड) येथील कविवर्य गोविंद के. पाटील तथा जी.के.सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त..!
गुरू, आज शनिवार दि.३१ ऑगस्ट रोजी शिक्षकी पेशातून निवृत्त होत आहात.
अजून मनमोकळं जगायला ते जगणं शिकवायला एकदासं अजून रान मोकळं झालं……
हे मनमुराद जगणं वारवार पालथी घालायला उदंड आयुष्य लाभो त्यासाठी आभाळभर शुभेच्छा हं….
खमका पेरक्या…
आज दोन तपांचा काळ उलटलेला. कोनवड्यातील तळ्याजवळचं यमाईचं मंदिर. मी पायीच की सायकल बियकलीनं तिथं पोचलेलो. किनट पडून गेलेला वकोत. देवळात लाईटही नसलेली. सगळे जीवाभावाचे गावकरी तिथं जमलेले. गुलालानं माखलेले. त्यात एक चेहरा तर लयच माखलेला… म्होरक्या झालेला. बँक की कसली तरी निवडणूक त्या चेहऱ्यानं जिंकलेली. त्या तडफदार चेहऱ्यातील खंबीर नेतृत्वाचा इजेसो करत ती जीवाभावाची आपली माणसं तिथं आलेली. भाषण, सत्कार असं काय- बाय तिथं झालं गळाभेटीही झाल्या. मी हे सारं त्यातला एक साक्षीदार कार्यकर्ता होऊन न्ह्याळत होतो. इतक्यात मलाही या नेतृत्वाची गळाभेट लाभली. या नेतृत्वाचं अभिनंदन करण्याची संधी अशी आयती चालून आली. अभिनंदन करता मला चक्क कडकडून मिठीच मारली. मीही आनंदाच्या गुलालानं आर्धा माखून अख्खा सुखावलो. मला घबाड गावल्यागत झालं. आयुष्याभर पुरून उरणारं न संपणारं हे घबाड म्हणजेच असंख्य गरजवंतांना आधारवड ठरलेले मुलुख पालथी घालीत पेरत सुटलेला हरहुन्नरी मुसाफिर खमका पेरक्या
जी. के. बापू म्हणजेच कविवर्य श्री. गोविंद केरबा पाटील.
तिथनं पुढं पदोपदी हे घरादाराचे गोविंदराव माझे गुरू झाले. हा रवी गुरव लिहिणारा…हिंडणारा… माणसं हुडीकणारा पाचवड्याचा. इतकाच माझा परिचय लळा आणि बापू म्हणजेच प्रयोगशील शिक्षक, पत्रकार, कवी, साहित्यिक, शिळगाण्याचे हौशी गायक असा माझ्यापुढचा गुरू आदर्श. हा दुवाच आम्हा दोघांना एकत्र आणण्यास तसा पुरेसा ठरला. बापूंची पहिली भेट ही अशी गुरू सहवास देणारी ठरली. मग मी त्यांचा नि ते माझे झाले. खरंच ती पहिली ग्रेट भेट झाली नसती तर मी काहीच कमवलं नसतं. इतकंच की माणूस अशीही ओळख देणं अशक्य झालं असतं. ती पहिली भेट आठवण्याचं कारण म्हणजे आता बापू तुम्ही शिक्षकी पेशातील प्रदीर्घ अशा अध्यापन सेवेतून सेवानिवृत्त होत आहात. मग म्हटलं जरा भूतकाळ नजरे-हाताखालनं तरी घालूयाच. बरंचसं काही लिहिलं मनाच्या समाधानासाठी; पण आपल्याला शब्दात बांधणं नाही घडू दिलंत कधी. एक कारण स्वत: विषयी काही बोलणं, लिहिणं, सांगणं आपणास मुळीच रूचत नाही. तुमचं म्हणणं अशानं आपल्याला उगीचच लय मोठं झाल्यागत वाटतय. मग मी गप बसण्याशिवाय पर्यायच नसतो माझ्यापुढं; पण आज आपल्या माघारी चोरून लिहावं म्हटलं आपल्या विषयी….त्याचा सराव जरा…जरा जरा..थेंबे थेंबे ….शब्द शब्द साठवत बऱ्याच वर्षांपासनं सुरू…तो तुमचा एक आदरयुक्त धाक माझ्या मनामध्ये आहे त्याला जागतच मी ही भूतकाळाची कमाई चाचपणी करत….अर्थात हे वाचल्यावर तुम्ही म्हणणारच, “गाढव आहेस तू…आता तर खरंच गाढव आहेस… ” तरीही ही माझ्यासाठीची शाबासकीच असेल. मला पुनःश्च प्रेरणा देईल. माझ्या लेखनावर जितकं प्रेम तितकंच माझ्यावरही जिवापाड असंच. यातनंच आपला धडपडी परिचय पट थोडासा उलगडत गेला. तो जमेल तसा सांडत.. मांडत जावंसं वाटतं. बघा बा…नाहीतर आपली काय धडगत नाही….
बापू, आपण माणसं, विद्यार्थी, घडवण्यात पारंगत. अभियंता होता-होता शिक्षक झालात. कविता लिहित, गात, गुणगुणत शीळ घुमवत मुलुखगिरी… दुनियादारी करणं ही आपली खरी आवड आणि पुढं मग आपण दुचाकीवरनं केलेली साडेअकराशे कि.मी.ची वसईची उपडी पालथी पडून सोसावी अशी ती भटकंती… हां तो भाग वेगळा; पण साहित्याची ओढ भलती यातूनच वेदसागर साहित्यमंचाची मूहूर्तमेढ रोवली. पाच साहित्य संमेलनं फाटक्या खिशानंही दिमाखात पार पाडलीत नि भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायची पाळी आली. साहित्य प्रांत सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी ऐन तारुण्यात शाळकरी वयातच सक्रिय झालात. भैरव जादुगारासकट साहित्य प्रांतातील दिग्गजांची ओळख भेट या दशक्रोशीला यातूनच घडली. मी तर सायकलनं येऊन या समेलनांना हाजरी लावली. त्यावेळी तर तुमची गाठभेटही नव्हती. उत्तम श्रोता होऊन मला हा आस्वाद घेता आला. अध्यापन, शिक्षकांच्या समस्यांसाठीची संघटनात्मक सेवा, गुणवंत विद्यार्थी घडवणं, साहित्य रूजवण करणं, गरजवंताला मदत करणं अशी आपली अगणित कामं आणि जोडीला साहित्य साधना. कविता हा तर आपला प्राण..त्यात आता शीळ सूर धरून लयच घुमाय लागलीया…
गावशिवार हा आपला युट्युब चॅनल असंख्य कवींच्या कविता, कथाकारांची कथा, कादंबरीकारांच्या कादंबरींचं क्रमशः वाचन असं ललित साहित्य दूरवर पोहोचवत आहे. गावशिवारसाठी मला बोलता वाचक केलंत आणि रेडिओ शिट्टीचा तर निवेदक केलंत ते काय बाय भारी उपमा बहाल करूनच…दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या माध्यमातून साहित्य साधनेचं आपलं कार्य अथक सुरूच आहे.
सगळ्याच क्षेत्रात आपली भ्रमंती सुरू.
आपण शिक्षकी पेशा जोपासताना पत्रकारिताही केली. सकाळ, पुढारी अशी वर्तमानपत्रं आपलं लेखन घेऊन मिरवली. मला बी.ए.बी.एड्.पदवी शिक्षण घेऊन नोकरी नव्हती. मग माझ्यासाठी तुम्हीही धडपडू लागलात मला नोकरी लागावी म्हणून. त्यात पत्रकार व्हायचा माझा अट्टाहास. मला संधीच मिळत नव्हती. तुम्ही म्हटलात, “अरे, तुम्ही पोरं संपादक व्हायचं का ध्येय ठेवत नाही रे! म्हणजे हवं ते छापता येईल.” मग महासत्ताचं काम करशील काय? पण वर्तमानपत्रात फारसं काय मिळत नाही रे. काय करायचं तुझ्यासाठी?” म्हणत डोक्यालाही हात लावून बसलात. तसं कधी स्वत:साठीही तुम्ही हताश होत नाही. मग मी एका दुसऱ्या गावातून पत्रकार व्हायचं ठरवलं तर तुम्ही म्हणाला, तिथं जाऊनही हे शक्य नाही रे. मग तुमच्या नावाची एका नामांकित वर्तमान पत्राची डेटलाईन मला बहाल केलीत. तेही दहा हजारांचं फँक्स मशीन बहाल करून. ” हे धर जा घेऊन माझं त्या शे दोनशाच्या मानधनानं माझं काय बिघडत नाही…ते तूच घे जा आणि तूच लिही जा..” असं फॅक्स मशीन हातात देऊन म्हणत..रुपाया बैलगाडीच्या चाकाएवढा वाटणाऱ्या काळातलं ते दहा हजारांचं नवं कोरं मशीन होतं…. माझ्यासाठी ते लाख मोलाचं असंच. केवढी ही दानशूरता…..! त्या आपल्या बळावरच ‘नाव तुमचं नि गाव माझं’ अशी छुपी पत्रकारिता केली आणि ती संपादकांनाही गावलीती….तशात पुढं अनेक दारं ठोठावून, सगळीकडं हिंडून, हुडकून मग लोकमतकडं पत्रकार झालो. कुरात आपण कूर परिसर पत्रकार संघटना स्थापन केली. मी तिथं कार्यालय थाटून बसलो; पण पोटच भरेना झालं… बंद पडलं कार्यालय. तिथवर ये- जा करण्याचीही आर्थिक कूवत नसल्यानं घडलं. त्यानंतर लोकमतकडं भुदरगड तालुका प्रतिनिधी म्हणून कार्य सुरू राहिलं ते आपण दिलेल्या फँक्समुळं सोपं झालं. त्यानंतर लोकमतच्या शिरोली शिये फाटा कार्यालयात मुद्रितशोधक म्हणून सेवा बजावत राहिलो. तुम्ही तिथंही माझ्यासाठी खिसा झाडून मदत केलीच. ती तुमच्या लक्षात नसेल पण मला आठवतं…असा सदैव ऋणातच मी.
पत्रकारिता, निरंतर केंद्र, आकाशवाणी आणि मुद्रितशोधक अशा नोकऱ्या करूनही जगणं मार्गी लागेना. मग मी दापोलीचा मार्ग धरला. पंचायत समिती दापोलीत हजर झालो. ती कंत्राटी नोकरी. तिलाही राम राम केला आणि आपल्या पुरोगामी संघटनेच्या धाग्याला धरून मुलाखतीला गेलो…आपली माणसं भेटत गेली… नोकरी लागली…आ वासलेल्या अडचणीच्यावेळी तुम्ही म्हणालात “सगळ्यांकडं माग. आपली कोण ती यावेळी कळतात…” खूप आपली माणसं गाठ पडली ओ. त्यांचकडं मागितलं. दिलंही त्यांनी ही यादी भली मोठी आहे काळजात ठेवली जपून…गरजेच्यावेळी तुम्ही म्हणाला तसं केलं. ” दहा टक्यानं काढ… तू नुसती मुद्दल फेड मी व्याज फेडतो रे…” केवढी ताकद दिलीसा हो बापू! आपण…. मग म्होरं पळतच राहिलो तुमचा भक्कम आधार पाठीशी घेऊन. मी दिसलो की तुम्ही चल म्हणायचं नि मी गाडीत आत बसायचं नाहीतर गाडीवर ढ्यांग टाकायची.. पुढं…..कुणीकडं? असं विचारायचं नाही….मला घेऊन मुलुख हिंडीवलंसा…..हिंडतासाच…
‘जिकडं पुढा तिकडं मुलुख थोडा’ करीत…मन तृप्त करीत..
मी गोकुळ शिरगावात तर बापू तुम्ही कोनवड्यात. अचानक फोन. ….ये कोल्हापुरात जोतिबाला जायचं आहे….मी बुचकळ्यातच….काहीच कळेना मग आलो. भेटलो सी.बी.एस.ला दोघं… निघालो जोतिबाला एसटीन चांगभलं ऐकत….उतारलाव जोतिबाव… कुठलं दर्शन डायरेक्ट कमानीजवळनं चालत यमाईच्या देवळाजवळनं पायवाटेन उत्तरेला उतारलाव …च्या मारला तुम्ही आणि मग दोघांचं खेटं सुरू…..त्या अंगान हायवेला पेठवडगाव जवळ बिरोबा मंदिराजवळ पोहोचलाव भाकरी खाऊन रमत गमत …..एकान दुचाकीवरनं सोडलंबी जरा बघा…. नाहीतर पायांच्या खुट्या मोडायची पाळी व्हती अशात एक बगळा आपल्याला आडवून शंभर रूपये काढून मोकळा झालेला….
एकदा पोरं देवाला निघाल्यात म्हणून आईन भजी-भाकरी येरवाळी करून दिली….. कुठलं दर्शन… हेळव्यागत हिंडून आलाव एका मंदिरात भाकरी खाऊन.. मायाक्का चिंचणीत देवीचं दर्शन न घेता…. तेचं असं झालं….
काही वर्षांपूर्वी चिंचणी मायाक्काला जायचं असं मनात आलं. मला बापूंनी कॉल केला मी घरात पोहोचलो. आम्हा दोघांसाठी आईने भाकरी त्यावर झुणका आणि कांदा घालून ती बांधून माझ्याकडे दिली. आम्ही ती घेऊन निघालो पोरं देवीला निघाल्यात म्हणून आईचा आनंद गगनात मावत नव्हता. “सावकाश जावा आणि लवकर येवा रं बाबांनो!” असं ऐकतच आम्ही तिच्या नजरे पल्याड गेलाव. तीन- चार तास भ्रमंती करून आम्ही चिंचणी मायाक्काच्या मंदिराच्या आवारात दोघेही फिरलो. लोक कसले भक्तच ते देवीचे दर्शन घेण्यात व्यस्त होते. आईन दिलेली भाकरी कुठं खायची ती जागा तुम्ही शोधत होता. मी मागून नेमकं काय चाललंय याचा विचार करीत होतो. तिथं भाकरी खाण्यासारखी जागाच गावली नसल्यामुळं वाटेत एका साई मंदिरात ती खाल्ली. तिचीच चव अद्याप जिभेवर रेंगाळत आहे.. त्या दरम्यान कुडमुडे जोशी, पिंगळा जोशी, हेळवी अशा कुटुंबांची चौकशी केली… कुळांचा इतिहास जमवण्यासाठी तिथं गेलेलात हे मला तेव्हा समजलं नव्हतं…. नाहीतर चिंचणी मायाक्काची यात्रा घडली असती का? तसं कदापीही शक्य नव्हतं….
तुमच्यासारखं जगावं ते तुम्हीच आणि कुटुंबासोबत सर्वांना जगण्याचं बळ द्यावं तेही तुम्हीच. नोकरी, घर, मुलं, शेत नातेवाईक मित्र कला या साऱ्यांची सांगड घालत जगताना आई-वडिलांना गड्या कुठून तरी फिरवून आणावं त्यांना वेगळा आनंद द्यावा म्हणून तुम्ही एक वेगळाच बेत आखला. म्हणालात, “काय नाही गड्या आई बाबाला विमानानं फिरवून आणायचं.” मला हे बोलणं सुखद धक्का देऊन गेलं. हा बेत मला मनापासून आवडला; पण तुमच्यासारखा कल्याणकारी व्यक्तीचा हात आणि त्यात हातात पैसा उरायचा म्हणजे तसं लय नाही खरं जरा अवघडच ….. सर्वांना मदत करून उरलेल्या पैशात आपलं कुटुंब चालवणं… तसा तुमचा स्वतःचा वेगळा पायंडा… त्यातूनच पद्धतशीर चळवळी झेलत, पेलत, कार्यकर्ते पेरत चौफेर जगत असता. म्हणून मला ते थोडं कठीणच कसलं न परवडणार होतं असंच वाटलं; पण तुमच्यासाठी या जगात कधीच काहीच अवघड नसतं मनात आणील ते पूर्ण करणं एवढंच तुम्हाला ठाऊक. मनात आलं तर शहरात घर केव्हा बांधाल आणि गावात शेतावर कौलारू घर केव्हा उभं कराल याचा नेम नाही. तुमच्यासारखे तुम्हीच असं मनसोक्त जगू शकता. तुम्ही इतरांना आनंद देऊ शकता एवढं निश्चित त्यामुळं तुमचा बेत हा मलाही हवावासा वाटू लागला. विमानानं प्रवास करणंच काय ते जरी खरेदी करण्याची हिंमत तुम्ही दाखवलीत तरी कोणाला नवल वाटू नये. तुमचा हा निर्णय मला मनापासून आवडला मग आपण वाळवा मार्गे कोनवडेतून कोल्हापूरकडे तुमच्या दुचाकीवरून निघालो. वाटेत मावशीकडे थांबलो. तिथं आई-बाबांना भेटलो. त्यांची गाठोडी नीट बांधून त्यांना विमान प्रवासाचा पुढचा बेत समजावून सांगून निघालो. कसबा वाळव्यातून त्यांना वेगळ्या वाहनातून कोल्हापुरातील प्रसाद पाटील सरांच्या घरात यायला सांगून आम्ही आमच्या घोड्याला टाच मारली. गाडीला घोडा म्हणण्याचा पायंडा तुमचाच. तोच हातात लेखणी द्वारे कागदावरून दवडायला लागला. वडाप किंवा एस.टी.न प्रवास करीत आई-बाबा प्रसाद सरांच्या घरात पोहोचले. आपण दोघं कोल्हापुरात पोचलो. तिथं प्रसाद सरांना विमान प्रवासाची कल्पना दिली. बेत आधीच पक्का केला फोन आणि प्रत्यक्ष भेटीतून त्यांना उद्या विमानतळावर कसे सोडाल? मग आम्ही त्यांना घ्यायला बेळगावला कसे पोहोचू? याची चर्चा कधी भेटून तर फोनवरून अगोदर झाली. त्याला थोडा मुलामा देऊन आम्ही रात्री दूचाकीवरून बेळगावकडं निघालो. काळोख आणि बोचरी थंडी संगतीला घेऊन कोल्हापुरात आई-बाबा पोहोचलेत का, त्यांना प्रसाद सरांनी विमानतळ सोडण्याची व्यवस्था कशी केली? याची खात्री करून आपण कोल्हापूर सोडलं. कोल्हापूर ते निपाणी असा प्रवास नॉन स्टॉप झाला ….
तुमच्यासोबत घरातनं अंगावरच्या कपड्यानीशी मोकळ्या खिशानं मी बऱ्याचदा बाहेर पडत असतो. खाण्या पिण्याचं माझं तुम्हीच बघितलेलं. तुम्हीच विचारता कसलं नाश्ता आणि जेवणाच्या ताटावर नेऊनच बसवता. पोटाचं हाल तुम्ही कधीच होऊ दिलं नाही. गाडीचं नि आपलं पोट भरलेलं पाहिजे असं तुमचं ठाम मत…..त्यावेळी देखील तुम्ही तसंच केलं. पाय मोकळं करण्यासाठी दोघंही बाहेर पडलो. वाटेत एक सिनेमागृह लागलं तिथे सद्गुरू बाळूमामा यांच्या जीवनावरचा चित्रपट सुरू होता. बाळूमामांच्या अद्भुत लीला जास्तीत जास्त अर्धा तास बघितल्या असतील नसतील तेवढ्यात तुमच्या मनात आलं आणि आम्ही बाळूमामांना रामराम करून थिएटरच्या प्रवेशात प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या भंडाऱ्याकडे बघत बाहेर पडलाव. थांबायचं की जायचं हाच विचार डोक्यात घोळत होता. रात्री थंडीत तीन तासाचा प्रवास करून जाण्यापेक्षा सकाळी सकाळीच निघू असा विचार तुमच्या मनात आला तसं माझ्या अंगातली हुडहुडीत गायब झाली. विमान प्रवास करीत आई-बाबा उद्या बेळगावत केव्हा पोहोचतील याची खात्री करून घेतली आणि नेहमीप्रमाणं मला झोपायला सांगून पुस्तक वाचनात गडलात. मी झोपलो. तुम्ही नंतर झोपलाच असाल तुमचा झोपेपूर्वीचा मी झोपावं असाच हा पायंडा….मग तुमची झोप कळत नाही त्यामुळं…
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच अंघोळ चहापाणी आवरून आपण बेळगावकडं निघालो. बेळगावात येऊन बोगार वेसकडं जाणाऱ्या चौकात हॉटेलमध्ये नाश्ता केला. तिथून थेट विमानतळ साडेनऊच्या सुमारास विमानतळावर पोहोचलो. मग प्रसाद सरांशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला आई बाबा घरातनं बाहेर पडलेत विमानतळाकडे गेलेत हे समजलं. निवांत बसून विमानतळावरनं पुन्हा भ्रमणध्वनीवरनं संपर्क केला. बेळगाव विमानतळाच्या समोरील झाडीत आम्ही दोघं निवांत विमानाची आणि विमानातील दोघा प्रवाशांची आतुरतेनं वाट पाहत होतो. भ्रमणध्वनी सुरू झाला आणि प्रसाद सरांनी फ्लाईट आत्ता लागलंय …. विमानात आता चढतात असंही सांगितलं आणि कॉल कट झाला… पुन्हा सरांनी कॉल केला विमानानं कोल्हापूरचं उजळाईवाडी विमानतळ सोडलेलं… त्याचा चुईंं….. असा आवाज…. कानात शीळ घालून गेला आणि विमानानं बेळगावकडं प्रयाण केलं. फोन पुन्हा कट झाला आपण दोघं उभेच राहिलो विमान केव्हा येतो याची वाट बघत …अर्धा एक तास तरी लागेल असं आमचं बोलणं…. उभ राहून आम्ही दोघं पुढं पुढं सरकत होतो… चार चाकी गाड्या भुर्रकन आमच्या जवळून पुढं जाऊन पार्किंगला लागत होत्या. दुचाकी तशाच भरीत भर घालत होत्या. टाईट पोशाखातली माणसं तितक्याच टाईट नजरेने विमानाच्या येण्याची वाट बघत होते. त्यांच्या बॅगांच्या गाड्या आत बाहेर करीत होत्या. आम्ही दोघं जरा बावरल्या नजरेनं प्रवेशद्वाराजवळील तारेतून विमान कधी येणार याची वाट बघू लागलो. तेवढ्यात आवाजानं लक्ष वेधून घेतलं ….विमानतळावर विमान घिरट्या घालू लागलं. घड्याळात बघितलं तर दहा वाजून दहा मिनिटं झालेली. दोन तीन घरट्या विमानानं पूर्ण केल्या. विमान धावपट्टीवर उतरलं तसं आम्ही दोघं धावतच गेटमधून आत गेलो. विमानान बूड टेकला. दरवाजा कमळाच्या पाकळीगत उमलत खाली आला. त्यातून शिडी बाहेर आली आणि एका मागून एक प्रवाशी उतरले. आई बाबा कधी येणार एवढेच आम्ही पाहत होतो. गेटमधून आत जाता जाताच तारेच्या कुंपनाच्या छिद्रात मी कॅमेरा रोखून ठेवला होता…तो पाचशे रुपयांचा ….आई-बाबा कधी उतरतात आणि त्यांचा फोटो फोटो कधी काढतो अशी माझी गत झालेली. एवढ्यात हिरव्यागार साडीतली हळुवार पाय मोजीत उतरणारी आई आणि भगव्या केशरी फेट्यातले पांढऱ्या शर्टातले बाबा दिसले. मनान उडीच मारली आणि रोखून ठेवलेल्या हातांनी फोटो काढला. हूरळून जात नाचावंस वाटलं फोटो काढायला मनाई असल्यामुळं हळूच तारेच्या कुंपणातून फोटो काढून आम्ही आत गेलो. दोघे तरारा मोकळ्या हातानं आणि हसऱ्या चेहऱ्यानं पुढं सरसावले. आम्ही त्यांच्याजवळ गेलो. भेटताच कसं वाटलं विचारून मोकळे झालो. तसे दोघेही बोलते झाले ‘उडतान आणि उतरल्यावर जरा हादारलं बाकी काही वाटलं नाही. त्यांनी पट्ट्यांनी बांधलं होतं की..’ दोघांनी मनं मोकळी केली. तुमच्यासोबत मलाही खूप समाधान वाटलं. मग दुचाकी घोड्याची व्यवस्था कुठंतरी ठेवण्यासाठी केली. सर्वजण डोंगरच्या यलम्माच्या दिशेनं निघालो. आई-बाबांच्या विमान प्रवासासाठी कोल्हापूर ते बेळगाव प्रवासात आम्हा दोघांची रात्र सरली होती. थांबा घेत उसंत घेत आमचा प्रवास सुरू होता. आई-बाबा मात्र दहा-पंधरा मिनिटांतच कोल्हापुरातून बेळगावात पोहोचले होते. त्यांचा आनंद वाचून आमचा शीण भागोटा कधीच पळून गेला होता. टाईट पोझिशनच्या माणसांसोबत सैल कपड्यातली शेतकरी माणसं बघून साऱ्यांनाच नवल वाटला असेल. आम्हालाही तो क्षण नवल वाटावा असाच भासत होता. पुढं आमचा प्रवास सुरू झाला. डोंगरच्या आईला दर्शनाची आई-बाबांची इच्छा देखील तुम्ही पूर्ण केली. तिथं जाऊन त्यांना देवीचं दर्शन घेऊ दिलं. सोबतचा शिधा एका भक्तिनीला दान केला तो देवीला नैवेद दाव म्हणून आईच्या बाजूने बजावत वर दक्षिणा देऊन डोंगरच्या देवीचा निरोप घेतला आणि परतीचा प्रवास सुरू झाला. तो दुचाकी पर्यंत सुरूच होता. पुन्हा तिथून पुढं आम्ही दोघं दुचाकीवरून परतलो. आई बाबा एसटीनं परतले ते मनात विमानाचा उडता प्रवास ठेवूनच ….आम्हाला साक्षीदार बनवत …. पोटच्या गोळ्यांनं बाबा आईला घडवलेली विमान सफर आठवत मी तुमच्यासोबत घराकडे परतलो….तो विमान प्रवासातून आई बाबा उतरतानाचा फोटो तुमच्याकडं दिला होता बघा हुडकत बसा आता…..
तुम्ही असं भटकंतीचं कसलं सगळ्याचंच उगम प्रेरणास्थान. माझ्या भटकंतीचं पाठबळ. आर्थिक आणि मानसिक कणा भक्कम करणारं कणखर प्रायोजक माध्यम. कुणीकडं जायचं मनात आलं की थांबवणं तुमच्याकडनं तर सोडाच अन्य कुणाकडूनही थांबवणं कदापिही शक्य नसतं. भूत, वर्तमान आणि भविष्यातील तुमचा हाच निर्णय असतो. तुमच्या याच निर्णयामुळं कडगावात वेदगंगा नदीच्या पात्रात रात्री भोजनाचा आस्वाद घेता आला. रात्रभर तिथं एका शिक्षक मित्राकडं थांबून कडगावातून पश्चिमेकडीच्या दुर्गम रस्त्यानं पायवाटेन बैलगाडीच्या रस्त्यानं काळम्मावाडी धरणाच्या अखेरच्या टोकाला ऐन थंडीत आंघोळ करता आली. पाण्याच्या परतीच्या लाटांमुळे तयार झालेली काष्टशिल्पं तिथेच न्याहाळता आली. आधाशीपणाने गोळा करता आली. दुचाकीवरून धरण, निसर्ग डोळ्यांच्या खोबनीत साठवता साठवता कडकडून भूक लागल्यावर एका हॉटेलवर भडंग चहावर ताव मारता आला. नडीलाही माझे तुटपुंजे पैसे बाहेर काढू दिले नाहीत. अरण्यवाचक पक्षी निरीक्षक व्ही. डी. पाटील, आनंदराव नलवडे साहेब यांच्या शेतावर फिरता आलं. काटे -कुटे , दगड- धोंडे, गवत, झाडं झुडं, ओढे, नाले पालथी घालता आले. व्ही डी. सरांचं निसर्ग सौंदर्यानं नटलेलं इको फ्रेंडली घर गारव्याच्या मंडपात माठातलं पाणी पीत पपय, वाळूक, आंबं खात डोळ्यात साठवता आलं. किल्ले भुदरगडची नागमोडी लाल चढण चढणीच्या टोकावरचा दगड छायाचित्रांमधून बांधून ठेवता आला. गडाची तोफ, मावळतीचा रवी, रानफुल़ं, तटबंदी यांची माहिती घेता आली. उगळीच्या माळावर तुमच्या कथाकथनातून हसता आलं. तुमच्या मित्रांच्या शिवारात बिंधास्त फिरून व्ही.डी.सरांच्या चाकून आंब्याची चव मालक सोबत नसतानाही घेता आली. इस्लामपूरचे कवीमित्र सुरेश मोहिते यांच्या घरी दिवाळीचा फराळ घेऊन जाता आलं. दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभांना सांगली पर्यंत जाऊन कवी संपादक विजय चोरमारे, प्राध्यापक एकनाथ पाटील, एस.डी. पाटील यांच्यासमवेत साहित्यिक चर्चा ऐकता आल्या. अशोक पाटील यांच्या लग्नाच्या निमित्तानं जेष्ठ साहित्य गुरुवर्य डॉक्टर राजन गवस, प्राध्यापक विजय निंबाळकर यांच्या सहवासात चार चाकीतून जाता आलं. कोल्हापूरातील शैक्षणिक प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, सभा समारंभ सतत अलर्ट राहून करता आलं. दिवाळी कोल्हापुरातूनच अनेकदा अनुभवत आली. दिवस रात्र बाहेर काढता आली. कडाक्याच्या थंडीत गाडीवरून उतरून शेकोटीची ऊब घेतली. काळोखात एकट्यान घरापर्यंत गाडी घेऊन येण्याची संधी मिळाली. कुठेही दिवस रात्र काढता – काढता कोल्हापूरच्या तुमच्या नव्या घरात बिनभोर झोप घेतली. कोकणात पालगड, दापोली, दाभोळ, मुरूड या पर्यटन स्थळांनाही तुमच्यामुळेच वळसा घालता आला. खूप खूप समाधानानं तुमच्यासोबत फिरलो. रिकाम्या हातानं फिरणं ही मनाला समाधान देऊन गेलं. घरगुती अडचणींमुळे तुमच्या सोबतची भटकंती बऱ्याचदा अर्ध्यावर सोडावी लागली…तीच मनात सल…धावणाऱ्या तुमच्यासोबत कुठेही जावं. एकटं कधीच वाटत नाही.
अशा खूप भटकंत्या मनात आहेत. मात्र सगळ्या भटकंतीत सरस ठरली ती कोल्हापूर बेळगाव विमान सफर. अनोखी आणि चिरस्मरणीय…. प्रत्येक लाडक्या मुलांनी विचार करावी… बोध घ्यावी अशीच ती सफर होती….तुमच्यासोबतच्या शेकडो भटकंतींना मी सामोरा गेलो आहे कसला आडवाच पडलोय… एकीकडं ठरवून दुसरीकडं पोचलोय…
जाता जाता कसलं थांबता थांबता आणि जरा आठवलं… थांबती व्हय ही आठवणींची लांबड…यातनंबी कायतरी इकशे एक टक्के सांगायचं राहणारच….तरीबी जराशी ही उजळणी..मुलांसाठी साहित्याची रुजवण, गुरुवर्य बी. एस. शिंगे यांच्यासाठीचा गुरुदक्षिणा अंक हे सारं चिरस्मरणीयच….
तीन घरं बांधलीत खरं एकाचीही वास्तुशांती नाही….संविधान पूजन करून जाणीवपूर्वक जमा केलेली देणगी पेठ्शिवापूर आश्रम शाळेतील मुलांसाठी बहाल केलीत. दिदीचा साखरपुडा, लग्न तेही पुरोगामी विचारांचं प्रतीकच. काकवादेवीची ऊन, वारा, पाऊस खात पडून कुजून जाणारी वस्त्रं डोळस श्रद्धा आणि भक्तिभावाने गरजूंना दान केलीत…मुलं दप्तर घेऊन बागडली ती यातूनच….
हिच्या माघारी तुम्हाला वाळवलेले मासे द्यावे म्हणून ते आणून ठेवलेले. अमृत चव्हाणकडनं. मग घरात त्याचा वास नको म्हणून बाहेरच बांधून ठेवले गॅलरीत बाहेरनंच चढून नाना तरा करून. थोड्यावेळाने घर मालकीण दंगा करीत बाहेर. सर, काय बांधून ठेवलंत काय? मी काय काय अशी बोबडी वळतच बाहेर … भिंगच फुटलं …. झालं तर मांजार खाली पाडून, वडून, तोडून पशार… मासं तेवढं गावलं कसं बसं…. मालकीण म्हणाल्या मला सांगायचं आमच्याकडे ठेवलं असतं. मी आवंढा गिळून गपच चोरागत …. सोडंबी अशीच उठाठेव करून आणलंतं या शाकाहारी प्राण्यान…..
मला, बालसाहित्यिक बाळ पोतदार आणि साहित्यिक मित्र प्रा. शिवाजी देसाई अशा आम्हा त्रयींना गावशिवार दिवाळी अंकासाठी संपादकीय जबाबदारी पेलता आली… पुरोगामी संघटनेचे संस्थापक आबासाहेब पाटील यांच्या कुटुंबियांना भेटून मनात सह्याद्री एवढा उत्तुंग पुतळा उभारता आला….. या अशा असंख्य सहवास भ्रमंती अविरत चालणाऱ्या पायांमधून डोळ्यात तुडुंब भरून ठेवल्या आहेत…. मात्र तुम्ही आई-बाबांना विमान प्रवास घडविला तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. मला तो माझाच विमान प्रवास वाटतो… विमाना खालून केलेला. आतून आनंद देणारा.. भार वाहणारा आणि आई वडिलांची सेवा करावी असा माझ्यासारख्याला संदेश देणारा…. मनात घर करून घिरट्या घालणारा… क्षणात इथं तर क्षणात तिथं पोहोचणारा…. पोचवणारा… याच विमानाची बेळगावात वाट बघता बघता तानाजी पाटील यांच्या सारखा नवा मैत्रीचा धागा देणारा…. दूर दूर पतंगासारखा उडत राहणारा विमान प्रवासाची स्पर्धा करणारा…. पैशाचं पुडकं पुढं करून प्रसाद सरासंगं मला मरणाच्या दारातून वाचवणारा… ‘माराय दिलाय व्हय तुम्हाला ‘ म्हणून डॉक्टरला जाब विचारणारा…. असा खंभीर आधारवड तो आपणच…..सकस ते पेरणारा खमका पेरक्याच ओ तुम्ही गुरू…..
अजून लय लय लिहायचं हाय…. पण आर्ध्यातच थांबतो.. तुमच्यासारख्या हरहुन्नरी पेरक्यामुळंच मी उगवलो, खडकावही टिकलो, घडत आलो पुढं निघालो… असं अनेक जणांना याच लाथ मारील तिथं पाणी काढणाऱ्या खमक्या पेरक्यानं घडवलं… पेरलं तेच त्याहून सकस उगवलं हिकडं तिकडं चोहूकडं हिरवंगार सगळं…. आता सहज आठवलं…. मनातनं उकरून मनातच साठवत… सांडत गेलो इतकच… आपणास सेवानिवृत्ती गाठून ही साठवणीतली शब्द शिदोरी गुरूदक्षिणा… मनस्वी शुभेच्छा हं गुरू… बापू!… शीळ घालत, कविता गाणं गुणगुणत हात देत व्हा पुढं माझ्या सारख्यांना घेऊन…. अशा अथक प्रवासासाठी आपणास निरोगी असं उदंड आयुष्य लाभो… चलाच….जय हो…!
-रवींद्र शिवाजी गुरव ९८२२२५४०४७

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा
