मुले व युवकांमधील बेशिस्त वर्तनाला आळा घालण्यासाठी शाश्वत विकास चळवळीने सुरू केले सभ्य भाषा-सभ्य वर्तन अभियान
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
मुले व युवकांमधील बेशिस्त वर्तनाला आळा घालण्यासाठी शाश्वत विकास चळवळीने सुरू केले सभ्य भाषा-सभ्य वर्तन अभियान
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
अलीकडच्या काळात शाळा, महाविद्यालयात तसेच समाजात वावरताना मुले-मुली तसेच युवक युवतीकडून बेशिस्त वर्तन घडत असल्याने समाज असंस्कृत बनत आहे, त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, यावर मार्ग म्हणून शाश्वत विकास चळवळीने सभ्य भाषा-सभ्य वर्तन अभियान राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. गारगोटी येथे भुदरगड व कागल तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात शाश्वत विकास चळवळीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अर्जुन कुंभार यांनी या अभियानाची पार्श्वभूमी, गरज आणि महत्त्व विशद केले. अलीकडे समाजात सर्वत्र असभ्य भाषा व असभ्य वर्तन वाढत असताना पाहायला मिळते. शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची भाषा शिवराळ झाल्याचे दिसते. अलीकडे तरुणांच्या वाढत्या हुल्लडबाजीमुळे व मद्यधुंदीमुळे सण, उत्सव, मिरवणुका, लग्न सोहळे, वाढदिवस यांचे पावित्र्य हरवलेले आहे. तर पर्यटन स्थळे, वाहतूक व पार्किंग इत्यादी ठिकाणी बेशिस्त वर्तन आणि वादाचे व हाणामारीचे प्रसंग घडताना पाहायला मिळतात. त्यातून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येते. महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे अनेक प्रसंग घडत आहेत.
अशा परिस्थितीत शाश्वत विकास चळवळीच्या वतीने एक व्यापक अभियान हाती घेतलेले असून, यामध्ये शिक्षण खाते, विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायती यांनी सहभागी होऊन समाजामध्ये सर्व स्तरावर उद्बोधन व प्रबोधन करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
भुदरगड तालुक्याचे उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करून शिक्षण विभागाकडून या अभियानासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. त्यांनी या अभियानाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रा आनंद चव्हाण यांनी या अभियान प्रकल्पाच्या आराखड्याचे वाचन व सूत्रसंचालन केले.
त्यानंतर झालेल्या चर्चेमध्ये डॉ नवज्योत देसाई, वजीर मकानदार, प्रा. विनय कुलकर्णी, बी ए सदलगे, उद्योजक प्रविण दाभोळे (मुरगुड), अँड संग्रामसिंह कडव,प्रा. दयानंद कांबळे, बळवंत रसाळ, एस के पाटील, जयवंत हावळ, उद्योजक सचिन मगदूम, प्रा.डॉ मिनाक्षी मोरे , सामंत सर, सुभाष कुंभार, वृक्षमित्र प्रा.आर.के.पाटील यांनी या अभियानाची आज फार गरज असून त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वतोपरी योगदान देण्याचे मान्य केले. लवकरच या अभियानाचा कृती आराखडा तयार करून शाळा महाविद्यालय व ग्रामपंचायतींसाठी एक आदर्श मॉडेल विकसित करण्याचे ठरले. जेष्ठ विचारवंत डॉ. सुभाष देसाई यांनी हा भुदरगड तालुक्यातील एक क्रांतिकारी निर्णय असल्याचे सांगितले. याची गरज संपूर्ण महाराष्ट्र व देशाला असून, ही क्रांती भुदरगडातून सुरू होते याच्याबद्दल शाश्वत विकास चळवळीचे अभिनंदन केले.
यावेळी कॉ,सम्राट मोरे, मच्छिंद्र मुगडे, सुशांत माळवी, डॉ जयसिंग कांबळे, प्राचार्य बी एस माने, टिपूगडे, यशवंत सरदेसाई, सुखदेव मगदूम, सुरेश खोत (मडीलगे खुर्द) यांचेसह शिक्षण, समाजकारण व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी सर्वांना सभ्य वर्तनाची शपथ देण्यात आली.
चळवळीचे उपाध्यक्ष उपअभियंता नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर पंचायत समितीचे उपअभियंता धनाजी कुंभार यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा
