शाळा हे कृतज्ञता व माणुसकी निर्माण करण्याचे केंद्र आहे : पत्रकार अतुल जोशी
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
शाळा हे कृतज्ञता व माणुसकी निर्माण करण्याचे केंद्र आहे : पत्रकार अतुल जोशी
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कागल
शाळा ही संस्कार, कृतज्ञता व माणुसकी निर्माण करण्याचे केंद्र आहे, असे मत कागल तालुका कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागल संस्थेचे संस्थापक सचिव पत्रकार अतुल जोशी यांनी व्यक्त केले. ते दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत, कागल मध्ये राज्यातील घडलेल्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पालक सभेप्रसंगी बोलत होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त अमेय जोशी, स्वामी समर्थ विद्या मंदिर कागलच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील तसेच पालक बंधू-भगिनी उपस्थित होते.
आई-वडील हे प्रत्येक पाल्याचे पहिले गुरु असून आपल्या पाल्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करा ,जेणेकरून प्रत्येक पाल्य हे आपली मते, विचार किंवा त्याच्या बाबत घडत असलेल्या सर्व गोष्टी ते पालकासमोर व्यक्त करेल. आधुनिक तंत्रज्ञानाची जवळीकता प्रत्येकाजवळ इतकी वाढलेली आहे की, आता नाती संपतातच की काय ? असा प्रश्न पडतो. आपल्या विद्यालयाकडे एक आदर्श शाळा म्हणून पाहिले जात असून विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीमध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. वेगवेगळ्या व्यसनांमुळे आपली पिढी बरबाद होत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहेत. आपल्या पाल्यांवर योग्यवेळी योग्य संस्कार केले तर आपले कुटुंब सुरक्षित राहील असे मत व्यक्त करताना त्यांनी सर्व समाज धर्मनिरपेक्ष राहिला पाहिजे. जात- पात, अंधश्रद्धा यामध्ये गुरफटून न जाता माणूसकी हाच खरा धर्म आहे या विचाराचे अनुकरण करा. आपल्या मुलींना जीजाऊ, झाशीची राणी बनवा म्हणजे ती सक्षम होईल, कणखर बनेल. प्रत्येक राष्ट्राचे निर्माण हे शिक्षण संस्थेत होत असते ही भावना मनात ठेऊन त पालकांनी शिक्षण संस्थेस सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त अमेय जोशी यांनी विद्यालयामधील तसेच शिक्षण संकुलातील विविध सोयी – सुविधा, शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे असलेले लक्ष, तसेच समाजातील प्रत्येक पालकांची पाल्याच्या बाबतीत असलेली जबाबदारी या विषयी माहिती दिली. प्रत्येकांनी सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने प्रत्यत्न करायला हवा असे मत व्यक्त केले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे यांना हसन मुश्रीफ फौंडेशनचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थापक सचिव अतुल जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केले. आभार जेष्ठ शिक्षक नाथा चव्हाण यांनी मानले तर सूत्रसंचलन बाजीराव आरडे यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
