नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोल्हापूरच्या योजनाबद्ध विकासाचे जनक : पद्मभूषण डॉ.जे.पी.नाईक – लेखन – प्रा.डॉ.उदयकुमार शिंदे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कोल्हापूरच्या योजनाबद्ध विकासाचे जनक : पद्मभूषण डॉ.जे.पी.नाईक – लेखन – प्रा.डॉ.उदयकुमार शिंदे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ज्ञानप्रबोधिनी विशेष : शिक्षणतज्ञ डॉ.जे.पी.नाईक जयंती

कोल्हापूरच्या योजनाबद्ध विकासाचे जनक : पद्मभूषण डॉ.जे.पी.नाईक
– लेखन – प्रा.डॉ.उदयकुमार शिंदे, उपाध्यक्ष, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे

५ सप्टेंबर ही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, पद्मभूषण डॉ.जे. पी. नाईक यांची जयंती. अवघ्या भारताला डॉ.नाईक हे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ञ म्हणून परिचित आहेत. त्यांचे देशाच्या शैक्षणिक विकासातील योगदान हे अलौकिक आहे. ०५ सप्टेंबर १९०७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या एका आडवळणी गावात जन्मलेल्या व वयाच्या नवव्या वर्षापर्यंत गुरेढोरे राखणारा एक मुलगा पुढे जाऊन गेल्या अडीच हजार वर्षातील युनेस्कोने जाहीर केलेल्या निवडक शंभर आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ञांच्या यादीत समाविष्ट होतो. इतका असामान्य व अलौकिक प्रतिभेचा हा माणूस होता. स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे सचिव म्हणून त्यांचे योगदान आपण सर्व जाणतोच, परंतु या भूमीत जन्मलेल्या या माणसाने कोल्हापूरच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक व नागरी विकासासाठी हे केलेले कार्य हे अतुलनीय आहे हे नवीन पिढीला ठाऊक नाही. आज त्यांच्या जयंतीदिनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत निस्वार्थी हेतूने डॉ. नाईक यांनी दिलेले योगदान आठवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
डॉ. नाईक यांचे मूळ नाव विठ्ठल हरी घोटगे. नाईक साहेबांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात असला तरी त्यांचे चौथीपर्यंत शिक्षण कडगाव ता.गडहिंग्लज येथे झाले व त्यानंतर त्यांचे सातवी पर्यंतचे व मुलकी प्राथमिक शिक्षण कर्नाटकातील बैलहोंगल या ठिकाणी झाले. पुन्हा महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये आले व त्यांनी तेथून सन १९२९ मध्ये बी.ए ही पदवी प्राप्त केली.गांधीजींच्या १९३० च्या असहकार आंदोलनात ते सहभागी झाले. त्यावेळी भूमिगत होऊन त्यांनी आपले नाव जयंत पांडुरंग नाईक असे बदलले. पुढे ते जे.पी.नाईक या नावानेच ओळखले जाऊ लागले. असहकार आंदोलनात त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली व त्यांची रवानगी बेल्लारीच्या तुरुंगात झाली. भूमिगत असताना ते त्या परिसरातील उप्पीनबेटेगिरी या खेड्यात राहत होते. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर या परिसरात शिक्षण व विकासाच्या योजना राबवण्यासाठी त्यांनी काम सुरू केले व आपल्या कामाने आजूबाजूच्या ५० खेड्यामध्ये शैक्षणिक व ग्रामीण विकासाची क्रांती घडवून आणली. त्यांचे त्या परिसरातले कार्य हा वेगळा लेखाचा विषय होऊ शकतो. धारवाड जिल्ह्यातील त्यांच्या शैक्षणिक विकासाचे कार्य धारवाडचे तत्कालीन शिक्षणाधिकारी सी.रा.तावडे यांनी पाहिले. तावडे हे कोल्हापूरचे होते. त्यांनी कोल्हापूर संस्थानातील शिक्षण व्यवस्थेला आकार देण्याच्या उद्देशाने डॉ.नाईक यांचे नाव कोल्हापूर संस्थानचे शिक्षणमंत्री रावबहादूर पी.सी.पाटील यांना सुचवले. अशा रीतीने कोल्हापूर संस्थानचे शिक्षण सचिव म्हणून महाविद्यालयीन शिक्षणानंतर डॉ. नाईक साहेब कोल्हापुरात आले. या पदाचा उपयोग त्यांनी केवळ शिक्षणासाठीच नव्हे तर कोल्हापूर शहर आणि संस्थान यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केला. १९४२ ते १९४७ या पाच वर्षाच्या काळात कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाची कामगिरी डॉ. नाईक यांनी पार पाडली. संस्थानाचा विविध अंगाने अभ्यास करून १९४६ मध्ये त्यांनी संस्थानाच्या सर्वंकष विकासाची पहिली योजना आणली. तो भारतातला पहिला प्रयोग होता. कोल्हापूरच्या संस्थांच्या एकूण पुनर्रचनेबाबत
जमीन,पाणी,वनसंपत्ती,शैक्षणिक सुविधा, लोकसहभाग, कार्यक्षम व प्रामाणिक प्रशासन आणि कला क्रीडांना उत्तेजन अशा पंचसूत्रीवर त्यांनी ही योजना तयार केली होती. त्यामध्येच उद्याचे कोल्हापूर हे शहराच्या भविष्याचे चित्र त्यांनी रेखाटले होते
कोल्हापूरच्या शैक्षणिक विकासाच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास, संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे असून केवळ भागणार नाही तर ते वंचितांच्या दाराशी नेले पाहिजे. यासाठी संस्थानाच्या सर्व खेड्यापाड्यांचे पहिले शैक्षणिक सर्वेक्षण त्यांनी केले. हा देखील भारतातला पहिला प्रयोग होता. त्यामुळे तत्कालीन गरीब वस्त्यांच्या शेजारी शाळा स्थापन केल्या गेल्या उदा. दत्ताजीराव माने शाळा, राजारामपुरी पलीकडे शाळा क्रमांक 9, खोल खंडोबा जवळील शाळा, रविवार पेठेतील शेलाजी वनाची शाळा, रेसकोर्स जवळील ताराबाई विद्यालय इत्यादी. त्यामुळे संस्थानातील प्राथमिक शिक्षण प्रचंड वेगवान झाले. केवळ शाळा ग्रामीण वस्त्यांच्या जवळ जाऊन भागणार नाहीत, तर त्या लोकसहभागाने भक्कम करण्यावर त्यांचा भर होता. त्यासाठी श्रीमंत नागरिकांच्या कडून मोठ्या देणग्या मिळवून त्यांनी शाळा उभा केल्या. खाजगी शाळांच्या आर्थिक स्थैर्यासाठी संस्थानामध्ये ग्रांट इन कोड त्यांनी लागू केला. कोल्हापूरचे दातृत्वशील उद्योगपती प्रभाकरपंत कोरगावकर हे नाईक साहेबांच्या कार्याने प्रभावित झाले व त्या काळी स्वत:च्या संपत्तीतून ३ लाख रुपयांचा विश्वस्त निधी देवून श्री.गोविंदराव कोरगावकर धर्मादाय संस्था कोल्हापुरात स्थापन केली ती आजही आपले सामाजिक योगदान देत आहे. शैक्षणिक मागासलेपणातच राष्ट्रीय मागासलेपणाचे मूळ आहे हे नाईक साहेबांना ठाऊक होते. शिक्षक प्रशिक्षणाकडे देखील डॉ. नाईकांचे विशेष लक्ष होते कोल्हापूर जवळच्या रुकडी येथे त्यांनी शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय सुरू केलेले होते. याच कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यातील गारगोटी या गावात ‘शिक्षणातून ग्रामीण पुनर्रचना व ग्रामीण पुनर्रचनेतून शिक्षण’ या सूत्राचा वापर करून श्री.मौनी विद्यापीठ या पहिल्या ग्रामीण विद्यापीठाच्या स्थापनेतव विकासात त्यांची अग्रणी भूमिका होती. शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव प्राथमिक शिक्षणात होण्यासाठी व त्याची कार्यक्षम रीतीने अंमलबजावणी होण्यासाठी संस्थानात ‘इन्स्पेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन’ हे पद त्यांनी निर्माण केले व क्रीडा क्षेत्रातील महनीय व्यक्तिमत्व मेघनाथ नागेशकर यांना त्याची जबाबदारी दिली. शाळांना क्रीडांगणे असलीच पाहिजेत यासाठी कोल्हापुरातील वापरात नसलेली अस्वच्छ जुनी तळी बुजवून त्यांचे क्रीडांगणात रूपांतर केले. वरूणतीर्थ मैदान, खंबाळा तलाव, कपिलतीर्थ मंडई हे त्यांच्याच नियोजनाचे प्रतिक आहे. आज आपल्याला दिसत असलेल्या संध्यामठाचे सानिध्य पुरातन आहे. त्याजवळ जवळपास दीड एकर जागेवर भले मोठे डबके होते. नाईक साहेबांनी ते डबके मुजवून त्याठिकाणी प्रशस्त बाग केली. ती बाग आजची पद्माराजे बाग म्हणून ओळखली जाते. याच पद्धतीने हुतात्मा पार्कच्या विकासाची योजना नाईक साहेबांच्या डोक्यात होती परंतु ती अपूर्ण राहिली. शहर विकासामध्ये बागा आणि क्रीडांगणे यांचे महत्त्व जवळपास आठ दशकापूर्वी त्यांनी जाणले होते म्हणूनच आज कोल्हापूरमध्ये आपल्याला त्याचे अस्तित्व पाहायला मिळते. त्यामुळे शाळांना पटांगणे तर उपलब्ध झालीच परंतु विस्तारासाठी जागाही उपलब्ध झाल्या. कोल्हापुरातील खेळाडूंना पतियाळाच्या ऑलम्पिक असोसिएशन मध्ये प्रतिनिधित्व मिळावे यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.
त्यांच्या शैक्षणिक कामाचा आवाका व वेग पाहून त्यांना कोल्हापूर संस्थानाचे विकास सचिव बनवण्यात आले. ही नवीन जबाबदारी त्यांनी आवडीने स्वीकारली. त्यासाठी सुरवातीसच शहराच्या प्रमाणबद्ध विकासासाठी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट कडून शहर आणि संस्थान यांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण त्यांनी करून घेतले. त्याचबरोबर डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाकडून उत्खनन करून कोल्हापूरच्या जुन्या सांस्कृतिक प्राचीन ठेव्याचा त्यांनी शोध घेतला. त्यासाठी प्रसिद्ध पुरातत्ववेत्ते डॉ. सांकलिया यांच्या द्वारे ब्रम्हपुरी येथे उत्खनन करवून घेऊन महत्वाचे अवशेष शोधले.
कोल्हापूरच्या नगर विकासाच्या बाबतीत नाईकसाहेबांची दृष्टी विलक्षण होती. शहरांच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी बागांची आखणी करणे व तिथे मुलांच्या खेळण्याची व करमणुकीच्या साधनांची व्यवस्था करणे यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले. त्याची प्रचिती आज आपल्याला पदोपदी येते. भास्करराव जाधवांच्या नावाने सुसज्ज वाचनालय तयार करणे असो किंवा देवल क्लबसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणे अशा कोल्हापूर चा सांस्कृतिक बाज व ठेवण जपण्यासाठी आवश्यक गोष्टी साहेबांनी प्राधान्याने केल्या. महाराष्ट्राचे आराध्य दैवत अंबाबाई मंदिरातील अस्वच्छ कुंडे मुजवून तिथे बगीचे तयार करणे, तिथल्या दुकानांना शिस्त लावणे व परिसरातील अधिकाधिक मोकळी जागा निर्माण करणे यासाठी नाईक साहेबांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. भविष्यातील महालक्ष्मी मंदिराचे एक शक्ती व भक्ती स्थान म्हणून होऊ घातलेला विकास त्यांनी लक्षात घेतला व देवळाच्या सभोवताली असणाऱ्या चारी दिशांच्या मोठ्या दरवाजांच्या समोर असणारे रस्ते रुंद करण्याची योजना त्यांनी आखली. त्याच्यातूनच निर्माण झालेला पश्चिमेकडचा नवा ताराबाई रोड डॉ.नाईकांच्या नगर रचनाशास्त्राच्या अभ्यासाचे उत्तम उदाहरण मानले जाते. अंबाबाईच्या मंदिराभोवतीच्या परिसराचा अत्यंत सांगोपांग अभ्यास करून हाच ताराबाई रोड पुढे नेऊन रंकाळा तलावाला जोडण्याची दूरदृष्टी त्यांनी दाखवली. तसेच अंबाबाईच्या दक्षिण दरवाजा समोरचा रस्ता व्यवस्थित करण्यासाठी जुन्या राजवाड्याचा काही भाग पाडून नागरिकाप्रमाणे दरबारालाही त्यागासाठी तयार असले पाहिजे याचा दंडक घालून दिला. महाराणी सरकारांनी अत्यंत मोकळ्या मनाने त्यासाठी सहमती व सहकार्य दिले. मोकळ्या झालेल्या जागेत आज विद्यापीठ हायस्कूल दिमाखाने उभे असल्याचे आपल्याला दिसते. शहरात असलेला दक्षिणोत्तर सुभाष रोड, साठमारी मैदाना शेजारून हुतात्मा पार्क कडे पूर्वेकडे जाणारा मोठा रस्ता, शाहूपुरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा असेंब्ली रोड, जुन्या शिवाजी थिएटर वरून पाण्याच्या खजिनेकडे जाणारा न्यू महाद्वार रोड हे नाईक साहेबांच्या उत्तम नगररचनेची साक्ष देतात.
शहर विकासाच्या बाबतीत त्यांच्यावर पॅट्रीक गेडीस व लुई मम्फर्ड दोन नगर रचनाशास्त्रज्ञांचा प्रचंड प्रभाव होता. कोणतेही शहर वसवताना शहराची भौगोलिक, मानसशास्त्रीय, अर्थशास्त्रीय, पर्यावरणीय व सांस्कृतिक सूत्रे परस्परपूरक पद्धतीने गुंफली पाहिजेत असे तत्व त्या दोन विचारवंताचे होते. त्याचा प्रभाव नाईक साहेबांच्यावर पडलेला होता. त्यामुळे कोल्हापूर शहराचा शहर सुधारणा कार्यक्रम राबवताना हे तत्व त्यांनी पाळल्याचे दिसून येते. शहरातली गर्दी कमी करण्यासाठी शहराशेजारीच मध्यमवर्गीयांसाठी आदर्श वसाहती बसवण्याची त्यांचे कल्पना होती. व त्याच अनुषंगाने आदरणीय श्रीपतराव बोंद्रे साहेबांच्या पुढाकाराने त्यांनी शालिनी पॅलेस च्या पिछाडीस महात्मा फुले हाउसिंग सोसायटी स्थापना केली. याच धर्तीवर शहर सुधारण्याच्या कार्यक्रमांतर्गत रंकाळ्याच्या पाण्यावर शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या विस्कळीत वस्त्यांना फुलेवाडी सारखी आदर्श वसाहत ,मुक्त सैनिक वसाहत, बेलबाग वसाहत अशा नवीन वसाहती स्थापन झाल्या. भाई माधवराव बागल यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास अतिशय साध्या वाटणाऱ्या या असामान्य प्रतिभेच्या व्यक्तीने कोल्हापूर शहराला नवे सौंदर्य आणले व जादूगारगाराप्रमाणे नवीन कोल्हापूर वसवले. कोल्हापूर शहर आणि त्याच्या नियोजनाचा इतका खोलवर विचार नाईक साहेबांनी केला होता.
शिक्षणाबरोबरच आरोग्य हा विषयही त्यांच्या खूप जिव्हाळ्याचा होता. बेल्लारीच्या तुरुंगात असताना त्यांनी वैद्यकीय शास्त्राचा अनौपचारिकपणे अभ्यास केला असल्यामुळे बेल्लारी परिसरात जनतेचे डॉक्टर म्हणूनच ते प्रसिद्ध होते. त्यामुळे कोल्हापुरातील नगरसुधारणेमध्ये त्यांनी आरोग्यालाही प्राधान्य दिले. आज आपण हागणदारीमुक्त गावाची चर्चा करतो परंतु ऐंशी वर्षांपूर्वी प्रत्येक घराला शौचालय असावे त्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल हा विचार करून त्याचा नगररचनेत अंतर्भाव त्यांनी केला. आज आपल्याला नगररचनेत दोन घरांच्या पाठीमागे जागा सोडून भंगी पॅसेजची योजना दिसते. त्याचे नाईक साहेब जनक आहेत. कोल्हापूरच्या खोल खंडोबा परिसरात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकल्प त्यांनी यशस्वी करून दाखवला. शहरात वाढत्या वस्तीसाठी डॉ.सिमेन्स यांच्या सल्ल्याने 300 खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल बांधायची योजना त्यांनी आखली. त्याचबरोबर कुष्टरोग पिडीतांच्या पुनर्वसनासाठी शेंडा पार्क या क्षेत्रात 562 एकरावर शाळा, वाचनालय, क्रीडांगण व त्यांच्या स्वयंरोजगारासाठी एक आदर्श वसाहत डॉ. नाईकांच्या कल्पनेतून योजिली गेली होती. चीन मधील ‘अनवाणी डॉक्टर’ ही कल्पना आपण जाणतोच, परंतु त्याच्या काही वर्षा अगोदर डॉ. नाईक यांनी फिरत्या रुग्णसेवकांच्या कल्पनेला प्रोत्साहन दिले व खेड्यातील आरोग्य सेवकांच्याकडे औषधाच्या पेट्या देऊन रुग्णांच्या वर प्राथमिक उपचार करण्याची जबाबदारी सोपवली होती. ही अभिनव व सोपी वैद्यकीय सेवेची कल्पना अनेक रुग्णांना जीवनदान देण्यासाठी उपयोगी ठरली. शहरातील नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणाऱ्या कळंबा तलावाला नळ योजना व फिल्टरिंग स्टेशनचे अद्यावत रूप त्यांनी दिले. तसेच शहराच्या पश्चिमेला चंबुखडीवर नदीतून पाणी खेचून ते शुद्ध करून मोठ्या दाबाने शहराला पुरवण्याची कल्पना नाईक साहेबांचीच होती.
केवळ कोल्हापूर असेच नव्हे, तर कोल्हापूर परिसरातील ग्रामीण भागाच्या विकासाची त्यांना प्रचंड ओढ होती. त्या अनुषंगाने त्यांनी एक सर्वेक्षण अहवाल तयार करून ३० ते ३५ खेड्यांचा एक विकास गट तयार करून योजना राबवण्याची कल्पना मांडली. पुढे जिल्हा परिषदेच्या रूपाने १९६० मध्ये हे विकेंद्रीकरण प्रत्यक्षात अमलात आले. या विकास गटातील प्रत्येक खेड्यासाठी रस्ते, पाणी, शाळा, वाचनालय अशा किमान सुविधा निर्माण करण्यासाठी
लोकसहभागातून प्रयत्न केले पाहिजेत असा विचार प्रामाणिकपणे मांडून त्यांनी तो प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले.
आधुनिक कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाठी एक दिशादर्शक काम डॉ. नाईक यांनी उभा केले आहे. कोल्हापूरच्या जडणघडणसाठी मार्गदर्शक ठरणारे ‘उद्याचे कोल्हापूर’ हे पुस्तक त्यांनी लिहले. तसेच कोल्हापूरच्या नगरपालिकेचा इतिहासही त्यांनी पुस्तकरूपाने लिहून ठेवला आहे. कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या शैक्षणिक, आरोग्य, नगरविकास, आणि कृषी क्षेत्राच्या विकासाची पाळेमुळे डॉ.नाईकांच्या दूरदृष्टीने रोवली गेली असल्याचे म्हटले तर वावगे ठरणारे नाही. आज त्यांच्या जयंती निमित्त या असामान्य प्रतिभेच्या निस्पृह,निस्वार्थी शिक्षणयोग्यास व नगर सुधारकास मनपूर्वक अभिवादन.

लेखक – प्रा.डॉ.उदयकुमार शिंदे, उपाध्यक्ष, डॉ.जे.पी.नाईक स्थापित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे
(संदर्भ- दूरदर्शी शिक्षण योगी – सविता भावे)

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30