ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचा चार पुस्तकांचा संच प्रसिद्ध
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचा चार पुस्तकांचा संच प्रसिद्ध
दर्जेदार पुस्तक संचामुळे वाचकांकडून उत्स्फूर्त स्वागत : अभिनंदन प्रकाशनच्या त्रिभुवननाथ जोशी यांचा विश्वास

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचा चार पुस्तकांचा संच नुकताच प्रसिद्ध झाला आहे. अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर यांनी हा पुस्तक संच प्रसिद्ध केला असून त्यामध्ये ‘महाराष्ट्राची पुरोगामी, प्रागतिक विचारधारा’, ‘भारतरत्न पुरस्कार प्राप्त महाराष्ट्राची नवरत्ने’, हे चरित्र संग्रह, ‘करू पर्यावरणाचे रक्षण..थोपवू प्लास्टिकचे आक्रमण’ हा पर्यावरण रक्षणा बाबतचा लेखसंग्रह आणि ‘ती अंधारी रात्र गडद होताना..!’ ही द्विपात्री एकांकिका यांचा समावेश आहे.
‘महाराष्ट्राची पुरोगामी, प्रागतिक विचारधारा’ आणि ‘भारतरत्न पुरस्कार प्राप्त महाराष्ट्राची नवरत्ने’ या लेखसंग्रहातून महाराष्ट्रातील सुमारे पंचेचाळीस समाजसुधारकांचे चरित्र लेख आहेत. वाचकांच्या अपेक्षा जाणून, महापुरुषांची आवश्यक माहिती नेमक्या भाषेत, अचूक आणि आटोपशीररित्या या पुस्तकांमध्ये मांडली आहे. हे लेखसंग्रह शिक्षक, विद्यार्थ्यांसह पालकांसाठी उपयुक्त आणि वाचनीय ठरणारे आहे. तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठीही उपयुक्त माहिती देणारी आहेत. तर पर्यावरण संदर्भात ‘करू पर्यावरणाचे रक्षण, थोपवू प्लास्टिकचे आक्रमण’ हे पुस्तक सध्याच्या ढासळत्या पर्यावरणाचे विदारक चित्र मांडत, पर्यावरण रक्षणाची समाजाची सामुहिक जबाबदारी, प्रभावीपणे अधोरेखित करते…!
‘ती अंधारी रात्र गडद होताना’ ही उत्कंठावर्धक, रहस्यमय, द्विपात्री एकांकिका प्रयोगक्षम असून असे लेखन आवडणाऱ्यांचे लक्ष वेधणारी आहे.
या पुस्तक संचाची निर्मिती दर्जेदार असून जीवन साळोखे यांच्या आजपर्यंतच्या पुस्तकांप्रमाणेच वाचक या पुस्तक संचाचे स्वागत करतील अशी अपेक्षा अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूरचे श्री.त्रिभुवननाथ जोशी यांनी यासंबंधी बोलताना व्यक्त केली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





