जंगलांना वणवे, सद्यस्थिती : असंवेदनशील हुल्लडबाजामुळेच पर्यटन क्षेत्रे उध्वस्त होताहेत…
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
जंगलांना वणवे, सद्यस्थिती : असंवेदनशील हुल्लडबाजामुळेच पर्यटन क्षेत्रे उध्वस्त होताहेत…
– अवधुत पाटील, पर्यावरणमित्र
अटविये माजी जैसा।
वन्हि रिघता सहसा।
लंघिता का दिशा।
वनौके तिथे।।
भगवान श्री कृष्णांनी कुरुक्षेत्रावर सांगितलेली भगवत गीता अन ज्ञानेश्वर माउलींनी सर्वसामान्यजनांना समजावी अशी प्राकृत भाषेत वर्णिलेली भावार्थदीपिका म्हणजेच आपली ज्ञानेश्वरी , ज्ञानेश्वरीतील ओवी अन ओवी डोळ्याखालून घालताना निसर्ग, जैवविविधता, वृक्षवल्ली संदर्भातील दाखले, त्यांचे महत्व अगदी अंतरकरणाला भिडते, त्याचबरोबर भक्तिरसात चिंब भिजताना निसर्गाचे अनमोल असे महत्वही समजून जाते. वरील अठराव्या अध्यायातील एकतीसाव्या क्रमांकाच्या ओवीत ज्ञानेश्वर माऊली , ‘जसा अरण्यात अग्नी सहज शिरला म्हणजे वनचर व पशुपक्षादीक दाही दिशास पळून जातील’ हे सार सांगतात, अन हेच आजच्या धावपळीच्या युगातल्या प्रत्येक व्यक्तीशी निगडित आहे असे मला वाटते. खरतर निसर्गचक्र नित्यनियमाने सुरु असते, त्यात कसलीही बाधा येत नाही, पण माणूस हा असा प्राणी आहे ज्याने अलिकडल्या काही वर्षात आपल्या स्वार्थी हेतुपायी जंगल संस्कृतीत जबरी शिरकाव केला अन् त्याचे परिणाम स्वरुप आज संपूर्ण जग झेलते आहे.
आपणही जीवो जीवस्य जीवनम् , जगा व जगू द्या ह्या उक्तीप्रमाणे निसर्ग व वन्यजीव यांचा आदर करुन सन्मानाने रहायला हवं, पण असे दिसत नाही. उलट पर्यटनाच्या नावाखाली मौजमजा हा एकमेव हेतू ठेवून विरंगुळा शोधत धांगडधिंगा घालणाऱ्यांची कमी नाही, अशा लोकांना आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल, काय वाटेल याची जराशीही फिकीर नसते, त्यात वाळलेल्या गवतावर काडी पेटवून टाकायची अन अघोरी आनंद मिळवायचा जे चित्र सर्रास दिसते आहे. भरीत भर म्हणून एखाद्या गावाला जोडणारा रस्ता हा जंगल भागातून असेल तर रात्रीचे लाईट्स, कर्णकर्कश हॉर्नचे आवाज वन्यजीवांची शांतता भंग करणारी.. दिवसाढवळ्या निसर्गसंपन्न देवराया, मंदिर परिसरात घुसखोरी करुन चुली मांडायच्या, ब्लूटूथ वर गाणी वाजवायची, मौजमजा करीत जेवनावळी झोडायच्या , सोबतीला मी इतरांपेक्षा कसा वेगळा आहे हे जगाला दाखविण्यासाठी झाडांना लोंबकाळत, फांद्या -पाने ओरबाडत फोटोग्राफी करवून घ्यायची.. एखाद्याला जाब विचारलाच तर उत्तरेही तितकीच उर्मट, बेजबाबदार..जणू काही जंगले यांची खाजगी मालमत्ताच..अश्या असंवेदनशील हुल्लडबाजामुळेच पर्यटन क्षेत्र बदनाम होत चाललंय.
तळेमाऊली जंगल भागाचे चित्रही काही वेगळे नाही. क्षणभर विसाव्यासाठी स्वप्नाहूनी सुंदर, जैवविविधतेने विपुल असं हे ठिकाण गारगोटी नजीकच्या खानापूर गावच्या हद्दीत. जंगल भागातील मंदिर, वृक्षवल्ली, स्वच्छ व निर्मळ पाण्याचे तळे म्हणजे ऑक्सीजन पार्कचं.. पण हा शुद्ध ऑक्सिजनचा खजिना कणा कणाने हरवतो आहे..सततची वर्दळ, निर्ढावलेल्या बेदरकार लोकांमुळेच तळेमाऊली मंदिर परिसर, जंगल भाग व पठार धोक्याच्या छायेत आले आहे अन याची प्रचिती हा सुंदर असा निसर्गरम्य परिसर याची देही अनुभवत आहे, हे वास्तव सत्य नाकारता येणार नाही.
खानापूर गावातून तळेमाऊली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पठार व काही अंतरावर जंगल भाग लागतो. रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे रखरखत्या उन्हातही वाऱ्याच्या मंद झुळकेवर डोलत प्रवासात आत्मिक शांती देणारी.. दुतर्फा सौंदर्यात भर घालणारी., पण ह्या पठार व जंगल भागास वणवे लागणे नित्याचेच झाले आहे. यात गेली काही वर्षे अथक परिश्रमाने जतन केलेली हजारो देशी झाडे आगीच्या भक्षस्थानी आलीत.. आगीची दाहकता इतकी भयंकर की बऱ्यापैकी वाढ झालेली, नव्याने लावलेली, तग धरू पाहणारी झाडे उभीच्या उभी पेटलीत. आगीच्या दाहकतेने सर्व जंगल गिळंकृत केले अन राहिली फक्त वाऱ्याबरोबर उडून जाणारी काळी कुट्ट राख..
आग थांबली पण आगीच्या भक्षस्थानी पडून काळी ठिकार झालेल्या झाडांचं काय असा प्रश्न मनाला वेदना देऊन जातो. झाडांना सुद्धा जीव असतो, संवेदना असतात मग त्यांना जगण्याचा अधिकार नाही का..? रस्त्याने जाणारे येणारे थोडा वेळ थांबून आग विझवण्याचा प्रयत्न करु शकतात पण कुणाला देणंघेणं पडलेलं नाही.. संवेदना बोथट झालेत की वेळ नाही..? ये जा करण्यासाठी रस्ता हवा, मग झाडे का नकोत..?
त्यासाठी गरज होती संवेदनशील मनाची ,।।।
निसर्ग झाडांप्रति संवेदना जाग्या झाल्या अन कोणत्याही परिस्थितीत जेव्हढे होईल तेव्हढे लवकरात लवकर झाडांना पाणी द्यायचे ठरले.
रविवार व सोमवार दि.9 व 10 मार्चचा दिवस ठरला. टँकरसाठीची जुळवाजुळव झाली. निसर्गाप्रती प्रेम, जिव्हाळा, आपुलकी दाखवत ॲड.पृथ्वीराज चौगुले, इंडियन आर्मीचे सुधीर येमगेकर व विद्यामंदिर, पळशिवणे शाळेचे पर्यावरणस्नेही अध्यापक श्री. नितीन बागूल यांनी पाण्याच्या टँकरची जबाबदारी घेतली. सोनाळीतील दत्तात्रय देसाई, शंभू देसाई यांचा टँकरही एका शब्दावर उपलब्द झाला. उन्हाच्या झळांची तमा न करता जान्हवी, मिथाली व आम्ही कुटुंबियांनी टँकरला पाइप्स वापरत, जिथे पाईप पोहचत नाही अश्या ठिकाणी बादल्या, घागरीने पाणी वाहून नेऊन झाडांना घातले. निसर्गाप्रति जिव्हाळा जपत आम्हीसुद्धा निसर्गाचे काही देणे लागतोय हे दाखवून दिले.
आगीत होरपळलेली केविलवाणी अबोल झाडे थंडगार पाण्याच्या शिडकाव्याने मनोमनी तृप्त झालीत अन मायेच्या ओलाव्यात चिंब चिंब भिजताना नक्कीच मनोमनी म्हणाली असतील ,
फिरुनी नवे जन्मेन मी ,।।
अवधुत पाटील,
पर्यावरणमित्र
आगीत होरपळलेल्या झाडांना टँकरद्वारे पाणीच्या निमित्ताने डेली डायरीतून साभार..

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
