अवकाश संशोधनात भारताचा जगभरात दबदबा : डॉ. एस. व्ही. शर्मा
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
अवकाश संशोधनात भारताचा जगभरात दबदबा : डॉ. एस. व्ही. शर्मा

प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी वर्धापनदिन
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
गुणवत्तेच्या जोरावर किफायतशीर निधीमध्ये चांद्रयान मोहिमांच्या यशस्वीतेमुळे अवकाशसंशोधन क्षेत्रात भारताचा जगभरात दबदबा निर्माण झाला आहे. भारताच्या गावागावातून असलेले गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आणि युवक, युवती हेच भारताचे बलस्थान असल्याचे प्रशंसोदगार इस्त्रोतील प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. शर्मा यांनी काढले.
प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी आणि माजी विद्यार्थी संघाच्या संयुक्त वर्धापनदिनी आयोजित समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पद्मश्री डॉ. जी. डी यादव, प्रशालेच्या माजी विद्यार्थीनी आणि शिवाजी विद्यापीठाच्या प्र.कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, आर श्रीविद्या शर्मा ,संस्थेचे चेअरमन, उदय सांगवडेकर ,व्हाईस चेअरमन डॉ सुनील कुबेर, संस्थेच्या कार्यवाह शरयू डिंगणकर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. शर्मा म्हणाले, १९७२ मध्ये इस्त्रोची स्थापना झाली आणि केवळ तीन वर्षात अडीच हजार किलोचा आर्यभट्ट हा उपग्रह भारताने रशियाच्या सहकार्याने पाठवला. सहा महिन्यांसाठी पाठवलेला हा उपग्रह तब्बल १० वर्षे कार्यरत होता ही भारताची कर्तबगारी आहे. २००८ साली चंद्रयांन १ ही मोहिम राबविण्यात आली. त्याच्याआधी ३० वर्षे आधी अमेरिकेचा उपग्रह चंद्रावर उतरला होता. परंतू चंद्रावर पाणी आहे हे जगात पहिल्यांदा भारताने शोधून काढले. जे कोणी करू शकत नाही ते भारत करतो हे यावेळी सिध्द केले गेले. २०१४ मध्ये मंगलयान मोहिम राबविण्यात आली तर दहा वर्षांपूर्वी आदित्य ही सुर्ययान मोहिम राबविण्यात आली. २०१९ ला जरी अपयश आले तरी आम्ही खचलो नाही आणि कोणत्याही देशाला शक्य झाले नाही ते भारताने करून दाखवले आणि दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवले गेले. कारण या ठिकाणी अतिशय उपयुक्त अशा इंधनाची शक्यता आम्हांला वाटते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन उदय सांगवडेकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय नियामक मंडळाचे सदस्य मिलिंद करमळकर यांनी करून दिला. यावेळी संस्थेतील विविध शाखेतील गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. ज्योती जाधव, डॉ. आर श्रीविद्या शर्मा यांनी आपल्या मनोगतामध्ये शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी डॉक्टर शर्मा यांच्याशी संवाद साधला. शर्मा यांनी चांद्रयान मोहिमेची आठवण असलेले घड्याळ संस्थेला सस्नेह भेट दिले. शाळेच्या अटल टिंकलिंग लॅब मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला .अध्यक्षीय समारोपामध्ये पद्मश्री डॉक्टर जी. डी. यादव यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व त्यांनी विशद केले. संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. सुनील कुबेर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता प्रायव्हेट हायस्कूल चे संगीत शिक्षक सिताराम जाधव यांनी गायलेल्या संपूर्ण वंदे मातरम ने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल हिरेमठ आणि अमित सुतार यांनी केले.
चौकट : आजही आम्ही एक तास नवीन वाचतो
डॉ. शर्मा यांच्या पत्नी विद्या या देखील इस्त्रोमध्ये कार्यरत असून चांद्रयांन ३मधील यान लॅडिंग करण्याच्या प्रक्रियेत त्यांची महत्वाची भूमिका होती. त्या म्हणाल्या, आजही आम्ही दोघेही रोज एक तास नवीन विषयावरील वाचन करतो. कारण आपण अद्ययावत असले पाहिजे. शिक्षकांचा आदर करण्याची गरज व्यक्त करतानाच प्रत्येकाने आपण निर्धार करून अभ्यासासह कोणत्याही कामात १०० टक्के योगदान देण्याचे आवाहन केले.
चौकट : लेट है लेकिन लेटेस्ट है
भारताच्या अवकाशसंशोधनाच्या कर्तबगारीची अनेक उदाहरणे यावेळी डॉ. शर्मा यांनी दिली. ते म्हणाले, आम्ही या क्षेत्रात उशिरा आलो. परंतू प्रत्येक वेळी जगाने जे सिध्द केले नाहीत ते आम्ही केले. आपल्या पूर्वजांनी यातील अनेक गोष्टी आधी सांगून ठेवल्या होत्या. त्यामुळे भारत ‘लेट है लेकिन लेटेस्ट है’ असे ते म्हणाले.
चौकट :
प्राजक्ता इनामदार ,तृप्ती टिपुगडे, ज्योत्स्ना पोवार, शितल हिरेमठ ,आसावरी गुळवणी, बी एल पाटील, संतोष पाटील ,एकता सोळुंके, गिरीश जांभळीकर , नागनाथ भोसले, सुनील गोंधळी, प्रसन्न जोशी ,यशवंत मरळीकर यांना एस व्ही शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





