कोल्हापूरची सामाजिक, सांस्कृतिक परंपरा अधिक समृद्ध करणारी ‘ध्येयवेडी माणसं’ – खासदार धैर्यशील माने
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
कोल्हापूरची सामाजिक, सांस्कृतिक परंपरा अधिक समृद्ध करणारी ‘ध्येयवेडी माणसं’ – खासदार धैर्यशील माने

लेखक संजय वारके यांच्या ‘ध्येयवेडी माणसं’ पुस्तकाचे प्रकाशन
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
सध्याच्या भांबावलेल्या वर्तमानातील समाजासमोर यथाशक्ती आपल्या विधायक कार्याचा वस्तुपाठ ठेवणाऱ्या जगावेगळ्या माणसांना शब्दबद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न लेखक संजय वारके यांनी “ध्येयवेडी माणसं ” या पुस्तकात केला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा निष्ठेने उजळणारी, आपल्या अवतीभवती वावरणारी परंतु स्वतः चे वेगळेपण जपणारी ही जिवंत माणसं आहेत.” असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले. ते अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर, यांनी प्रकाशित केलेल्या “ध्येयवेडी माणसं ” या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.
“अक्षरदालन”च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ.निवेदिता माने या होत्या. कुंडीतील रोपाला पाणी घालून प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात लेखक संजय वारके यांनी स्वागत करुन या पुस्तक लेखनामागील भूमिका स्पष्ट केली. विविध क्षेत्रात आपापल्या कार्याचा वसा निष्ठेने जपून समाजात ठसा उमटवणाऱ्या दहा व्यक्तींचा त्यांनी परिचय करून देत, त्यांचा सन्मानचिन्ह आणि पुस्तकसंच देऊन यथोचित गौरव केला.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आणि ग्रंथदान चळवळीचे जीवन साळोखे, शाहू चरित्राचे अभ्यासक डॉ.जे. के. पवार यांनी या पुस्तक निर्मितीबाबत माहिती दिली. तर प्रमुख वक्ते गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार यांनी, पुस्तकात न मावणाऱ्या जगावेगळ्या माणसांना शब्दबद्ध करण्याचा लेखक संजय वारके यांच्या प्रयत्नाचा गौरव करुन, अत्यंत सहज सोप्या भाषेत नेटकेपणाने या मुलखावेगळ्या माणसांचे चित्रण केल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, “या पुस्तकात चित्रण केलेली मुलखावेगळी माणसं हीच उद्याच्या समाजाकरिता आशेचा किरण पसरण्यासाठी सहाय्यक ठरणार आहेत. अशी माणसं समाजात सचोटीने वाटचाल करत, नंदादीपासारखी तेवत असतात. त्यांच्यामुळे सर्वसामान्यांचे नेहमीचे चाकोरीबद्ध आयुष्य अर्थपूर्ण होत असते.”
या प्रकाशन समारंभास डॉ.जी.पी.माळी, डॉ.चंद्रकांत पोतदार, डॉ.सनतकुमार खोत, मेजर भोसले, ॲड.श्रीकांत माळकर, मुख्याध्यापिका सौ.पद्मजा पाटील,सौ. सुरय्या मुजावर,अक्षरदालनचे रविंद्रनाथ जोशी, प्रकाशक त्रिभुवननाथ जोशी इ.सह मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते.समारोप मोहसीन पटेल यांनी केला. तर सुत्रसंचलन विष्णू सुतार यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space





