साहित्य अकादमीचा पुरस्कार कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला जाहीर
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
साहित्य अकादमीचा पुरस्कार कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला जाहीर

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोल्हापुरातील कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला जाहीर करण्यात आला असून एक लाखाचा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार १२ मार्च रोजी प्रदान करण्यात येणार आहे. रिंगाण या कादंबरीत मध्ये विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण करण्यात आलं आहे.
विस्थापित झाल्यानंतर आपल्या भूमीपासून लांब फेकले गेल्याची तयार झालेली धरणग्रस्तांची भावना, पावलापावलावर येणाऱ्या अडचणी, मनाला अस्वस्थ करणारा नवीन परिसर आणि प्राण्याबरोबरचा सततचा संघर्ष, बदलते ग्रामीण जीवन या सर्वांचे चित्रण करणारी कृष्णात खोत यांची कादंबरी म्हणजे रिंगाण. अतिशय प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या पुरस्काराचे माहोर उमटल्यानंतर विस्थापितांच्या संघर्षाला आणखी बळ मिळणार आहे.
गावठाण, रौंदाळा, झडझिंबड अशा अनेक कादंबरीच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती आणि संघर्ष मांडणाऱ्या खोत यांच्या ‘रिंगाण’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. यापूर्वी ‘रिंगाण’ला महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाला होता. रिंगाण मध्ये विस्थापितांच्या जगण्याच खोत यांनी केलेले चित्रण अतिशय मनाला भावणारे आहे. या कादंबरीचा नायक आहे देवाप्पा. देवाप्पाची गावापासून उखडल्याची वेदना आणि पाळीव प्राण्यांचं मूळ आदिम हिंस्त्रभावाकडे होणाऱ्या स्थानांतराचं चित्रण आहे.
विस्थापित झाल्यानंतर आपल्या भूमीपासून लांब फेकले गेल्याची तयार झालेली भावना, मनाला अस्वस्थ करणारा नवीन परिसर, वातावरण आणि प्राण्याबरोबरचा संघर्ष यामध्ये मांडला आहे. देवाप्पा आणि म्हशींचं जीवघेणी झटापट यामध्ये आहे. मानवाचा व पाळीव प्राण्यांचा संघर्ष यामध्ये आहे. विस्थापन, आधुनिकतेचे पेच, प्राण्यांची मूळ आदिम हिंस्त्रता, माणूस आणि निसर्ग यांतील अनेक परिमाणांना साकार करणारी ही कादंबरी आहे.
पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या निकमवाडी येथे जन्मलेल्या कृष्णात खोत यांनी कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजमधून बी.ए. झाल्यानंतर बी.एड. करून क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या शिक्षण संस्थेत वसतिगृहाचा रेक्टर म्हणून काम सुरू केले. नोकरी करत करत इतिहास, राज्यशात्र आणि मराठीतून एम.ए. केले. त्यानंतर पन्हाळा तालुक्यातील कळे येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहेत.
खोत यांची २००५ मध्ये ‘गावठाण’ ही कांदबरी पुस्तक रूपानं प्रसिद्ध झाली. त्यानंतर रौंदाळा, झडझिंबाड, धुळमाती व रिंगाण या त्यांच्या कादंबरीने साहित्य विश्वात वेगळी प्रतिमा निर्माण केली. ग्रामीण जीवन आणि बदलते ग्रामसंस्कृती त्यांच्या कादंबरीत दिसते. २०१२ ला ‘झड झिंबड’ ही कांदबरी प्रकाशित झाली. या कादंबरीचा नायक पाऊस आहे. वाढणाऱ्या अंधश्रध्देचे वर्णन ‘झड झिंबड’मध्ये आहे. खेड्यातील जमिनीच्या व्यवहारांवर भाष्य करणारी कादंबरी म्हणून ‘धूळमाती’कडे पाहिलं जाते. ‘नागरल्या विना भुई’ हे पुस्तक म्हणजे खेडुतांच्या नैसर्गिक जगण्याविषयीचे हे व्यक्तिचित्रण आहे.
………………………….
कोट :
शेसव्वाशे घरांच्या निकमवाडी सारख्या वाडीतून देशाच्या राजधानीत आपल्या लेखणीची नाममुद्रा उमटवणारा लेखक म्हणून गौरव झाला याचा आनंद आहे. सामान्य खेडुतांसह त्यांच्या अनेक पिढ्यांची होणारी फरफट आजही मनाला अस्वस्थ करून जाते. अस्वस्थता अजून संपलेली नाही. त्यामुळं अजून लिहायचं आहे. पुरस्काराने त्याला आणखी उर्जा मिळाली आहे. – कृष्णात खोत
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





