गारगोटी शहरातील अवधूत कॉलनी येथे कोल्ह्याच्या लहान पिल्याला केलेले रेस्क्यू : लहान मुलांच्या सतर्कतेमुळे वन्य प्राण्याला मिळाले जीवनदान
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
गारगोटी शहरातील अवधूत कॉलनी येथे कोल्ह्याच्या लहान पिल्याला केलेले रेस्क्यू : लहान मुलांच्या सतर्कतेमुळे वन्य प्राण्याला मिळाले जीवनदान

(सायली मराठे याजकडून)
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
सध्याच्या तापमान वाढीमुळे वन्य प्राण्यांना अन्न व पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाच्या काहिलीमुळे वन्यजीव पाण्यासाठी भटकंती करत नागरी वस्त्यांकडे येत आहेत. काल रात्री गारगोटी शहरातील अवधूत कॉलनी येथे लहान मुलांच्या सतर्कतेमुळे कोल्ह्याच्या लहान पिल्याला जीवनदान मिळाले.
खळखळणारे नदीनाले, पाण्याने तुडुंब भरलेले डोह, झुळझुळ वाहणारे नद्यांचे प्रवाह, किलबिल करणारे पक्षी वृक्षवल्लींमध्ये मुक्तसंचार करणारे प्राणी असे दृष्य आज रानावनात पाहायला मिळत नाही. सूर्याने आग ओकणे सुरू केले आहे. त्यातच यावर्षी कधी नव्हे ते जवळपास ४२ अंश सेल्सीयस एवढे तापमान वाढले असल्याने जिवाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे निसर्गातील जलस्रोत आटले आहेत. उन्हाचे चटके आता जोरात बसत आहेत. जंगलातील नैसर्गिक जलसाठे आटले आहेत. पाणी मिळेल या आशेने वन्यप्राणी नागरी वस्त्यांच्या दिशेने कूच करीत आहेत. त्यात कांही हिंस्र प्राण्यांचाही समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मानव व वन्यप्राण्यातील संघर्ष उद्भवू शकतो. अन्न व पाण्याच्या शोधात असतांना कोल्ह्याचे लहान पिल्लू आपल्या कळपाला सोडून नागरी वस्तीत घुसल्याची घटना काल रात्री गारगोटी शहरात घडली आहे.
गारगोटी शहरातील अवधूत कॉलनी येथे काल रात्री सव्वा आठच्या दरम्यान श्रेया कुराडे व वेदांत कुराडे या लहान मुलांना घराच्या बाहेर खेळत असताना शेतीकडून घराच्या कंपाउंड कडे काहीतरी चालत येताना दिसले. पहिल्यांदा मांजर असल्याची शक्यता वाटली पण पुढे जाऊन पाहिले असता कोल्ह्याचे लहान पिल्लू असल्याचे निर्देशनास आले. याची माहिती कॉलनीत राहणाऱ्या निसर्गमित्र पत्रकार इंद्रजीत मराठे यांना दिली. सदर पिल्याला संजय सारंग, श्रद्धा सारंग, साम्राज्य मराठे याच्या मदतीने इंद्रजीत मराठे यांनी रेस्क्यू करून गारगोटी वनविभागाच्या ताब्यात दिले. यावेळी परिमंडळ वनअधिकारी बी.एन.शिंदे, वनरक्षक आशिष चाळसकर, रेस्क्यू सदस्य विजय जगताप, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर विजय पाटील, यांच्यासह वन विभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
पाण्याच्या अभावामुळे काही दुर्मिळ वन्य पशु पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हे वन्यप्राणी गावाकडे येऊ नये, यासाठी तालुक्यातील आरण्यात पाणवठे तयार करून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





