|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
सामाजिक कार्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा निर्णय : डॉ. लवटे यांच्या उच्च कोटीच्या दातृत्वाची कोल्हापूरकरांना प्रचिती

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
सामाजिक कार्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी जाहीर केला. हा कुटुंबांचा विश्वस्त निधी असला तरी त्यावर समाजाचा हक्क राहील. माझ्या कुटुंबांतील कोणीही सदस्य त्याचा लाभार्थी असणार नाही. असेही डॉ.लवटे यांनी सांगितले.
यासंदर्भात बोलताना डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, माझ्या कुटुंबांतील सदस्यांशी चर्चा केली आणि सामाजिक कार्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. कुटुंबांचा हा विश्वस्त निधी असला तरी त्यावर समाजाचा हक्क राहील. माझ्या कुटुंबांतील कोणीही सदस्य त्याचा लाभार्थी असणार नाही. मी सामाजिक कार्यासाठी ज्या रकमेची घोषणा केली त्या रकमेच्या आकड्याकडे पाहू नका. रककम खूप छोटी आहे. अंधार उजळण्यासाठी एक पणती जेवढं काम करते तेवढं जरी काम झालं तरी त्याचा मला आनंद आहे. मी यापुढेही अधिक नैतिकतेने समाजसेवा करत राहणार आहे.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी यंदा पंच्याहत्तरीत प्रवेश केला आहे. ११ एप्रिल रोजी त्यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस झाला. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. डॉ. सुनीलकुमार लवटे अमृतमहोत्सव सत्कार समितीने वर्षभराच्या कार्यक्रमांची निश्चिती केली आहे.
महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे मुख्य संवर्धक डॉ. विवेक सावंत यांच्या व्याख्यानाने या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. ‘कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षितीजे आणि मानव’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सल्लागार विनोदकुमार लोहिया होते. अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जी. पी. माळी, सचिव विश्वास सुतार, सहसचिव संजय कळके, खजिनदार प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राम गणेश गडकरी सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमासाठी मोठया संख्येने गर्दी झाली होती. सभागृह तुडुंब भरले होते. यावेळी दहा मिनिटाच्या भाषणात लवटे यांनी आपला जीवनपटच उलगडला. वयाच्या दहाव्या वर्षी कोल्हापुरात ठेवलेलं पाऊल, नोकरी, संसार, ज्ञानसाधना, प्राचार्यपद, विविध संस्थेतील काम असे जीवनातील विविध टप्पे उलगडले. माणसांनी टोकाची कृतीशीलता जपायला हवी अशी धारणा असणारा मी मनुष्य आहे. असे स्पष्ट केले.
डॉ.लवटे यांनी संत तुकाराम यांच्या अभंगाचा दाखला दिला. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याविषयी बोलले. कबीरांनी दिलेल्या उदाहरणाचा दाखल देत लवटे म्हणाले, नावेमध्ये जादा पाणी आणि घरामध्ये जादा पैसा झाला तर पाणी दोन्ही हातांनी बाहेर टाकावे. पैसा गरजूंना द्यावा. जादा पैसा आला तर शहाणा माणूस तो पैसा दुसऱ्यांना देतो, इतका शहाणपणा मला तुम्हा साऱ्यांकडून मिळाला आहे. मी काही रक्कम साठविली होती. यंदा माझा अमृतमहोत्सव होत आहे. या कार्यक्रमासाठी तुम्ही सारे इतके मोठया संख्येने आलात तो आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही.
यावेळी सभागृहात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





