ग्रंथसंच आणि गुलाबाची झाडे भेट देऊन निपाणी – कागल तालुक्यातील चाळीस उपक्रमशील शिक्षकांचा जाहीर गौरव : पर्यावरण रक्षण आणि वाचनसंस्कृतीचा केला जागर
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
ग्रंथसंच आणि गुलाबाची झाडे भेट देऊन निपाणी – कागल तालुक्यातील चाळीस उपक्रमशील शिक्षकांचा जाहीर गौरव : पर्यावरण रक्षण आणि वाचनसंस्कृतीचा केला जागर
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, निपाणी
सध्या प्रत्येक क्षेत्रात प्रदूषण वाढत आहे. ते सर्व प्रकारे रोखण्यासाठी प्रबोधनाची लढाई पुन्हा सुरू केली पाहिजे. त्यासाठी वाचनाची चळवळ गतीमान करून पुस्तक या माध्यमाचा प्रभावीपणे उपयोग करण्यास सर्व शिक्षकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांनी केले.
निपाणी येथील तलाश सामाजिक व आरोग्य संघटनेच्या वतीने आयोजित निपाणी व कागल तालुक्यातील उपक्रमशील, गुणी शिक्षकांच्या जाहीर गौरव समारंभात अध्यक्षपदावरून बोलत होते.
यावेळी निपाणी व कागल तालुक्यातील चाळीस उपक्रमशील, गुणी प्राथमिक शिक्षकांचा जाहीर गौरव करण्यात आला. शाल, श्रीफल, मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, दर्जेदार ग्रंथसंच आणि गुलाबाचे रोप देऊन सर्व शिक्षकांना यावेळी गौरविण्यात आले. तर प्रमुख पाहुणे प्राचार्य जीवन साळोखे आणि डॉ. विदुला नाईक (कोल्हापूर) यांचा, त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याबद्दल “जीवन गौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला.
या समारंभास निपाणीच्या गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, कागलच्या गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, ज्येष्ठ पर्यावरण प्रेमी डाॅ. विदूला स्वामी,देवराई वृक्ष चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते सुहास वायंगणकर, कोल्हापूर जिल्हा पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एस. के. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक तलाश सामाजिक संघटनेचे अध्यक्ष व समारंभाचे संयोजक डाॅ. सिध्दार्थ साळुंखे यांनी केले.
यावेळी समारंभाचे प्रमुख आयोजक नामदेवराव चौगले यांनी चाळीस गौरवप्राप्त शिक्षकांचा यथोचित परिचय करून त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्रीमती कासोटे यांनी कागल तालुक्यातील गुणी शिक्षकांमुळेच तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. निपाणीच्या गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी निपाणी आणि कागल तालुक्यातील शिक्षकांचा म्हणजेच महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील शिक्षकांचा प्रथमच असा जाहीर संयुक्त गौरव समारंभ होत असेल, असे सांगून शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळाशाळांतून वाचनसंस्कृती समृद्ध झाली पाहिजे,असे आग्रहाने प्रतिपादन केले. यावेळी पर्यावरणप्रेमी डाॅ. विदुला स्वामी आणि सुहास वायंगणकर यांनी पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व स्पष्ट करून ढासळत्या पर्यावरणाचे धोके सांगितले. एस,के. पाटील यांनी शिक्षकांच्या सेवाभावी कार्यास अशा सामाजिक संघटनांकडून सन्मान होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रमुख वक्ते, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जीवन साळोखे यांनी शिक्षकच समाजाच्या नव्या पिढीला घडवणारा शिल्पकार असल्याचे सांगून, वाचनाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांसह नवसमाजाची योग्य जडणघडण त्यांच्याकडून होईल, असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी प्राचार्य साळोखे यांनी आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत सर्व उपक्रमशील सत्कारमूर्ती शिक्षकांना व उपस्थित मान्यवरांना प्रत्येकी दर्जेदार ग्रंथसंच भेट दिले तर वृक्षमित्र नामदेवराव चौगले आणि सौ.अपूर्वा चौगले यांनी सत्कारमूर्तीसह, मान्यवरांना पिशवीतील गुलाब रोपे भेट दिली.
यावेळी डाॅ. संदीप चिखले, पार्वती कमते, सुनील चौगले, रमेश जाधव, राजू माने, रामदास पाटील, समीर मुजावर, सुरेश घाटगे, अशोक इंजल, दिनकर लाटकर, पांडुरंग पोवार आदीसह सत्कारमूर्ती शिक्षकांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत उत्साहात झालेल्या या समारंभाचा समारोप सौ. गीता खोत यांनी केला.
या समारंभाच्या यशस्वितेसाठी डॉ. सिद्धार्थ साळुंखे, नामदेवराव चौगले यांच्यासह त्यांच्या सहकार्यानी परिश्रम घेतले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा
