संविधान समजून घेतले तरच बाबासाहेब समजतील : प्रा.पंकज भारतीय
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
संविधान समजून घेतले तरच बाबासाहेब समजतील : प्रा.पंकज भारतीय
गारगोटीत संविधान अमृत महोत्सव साजरा
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
बाबासाहेबांची लढाई समतेसाठी होती. संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिले. संविधान समजून घेतले तरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजतील, असे उदगार प्रख्यात व्याख्याते, संविधान अभ्यासक प्रा.पंकज भारतीय (अमरावती) यांनी काढले.
गारगोटी येथे भारतीय संविधान अमृत महोत्सव व भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्रा.पंकज भारतीय ‘संविधानाचा अमृत महोत्सव’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी समाजकल्याण सभापती गोपाळराव कांबळे होते. जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.पंकज भारतीय म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. संविधानाच्या माध्यमातून सर्व समाज घटकांसाठी समान न्यायाची भूमिका घेतली. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानावरच देशाचा कारभार सुरू आहे. प्रत्येक नागरिकाने संविधान समजून घेण्याची गरज असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा योग्य वापर करण्याची आवश्यकता आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्राचार्य अर्जुन आबिटकर म्हणाले, भुदरगड तालुक्यातील आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तालुक्यात राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे संघटन सक्षम होण्यास मदत झाली आहे. भुदरगड तालुक्यातील आंबेडकरी जनतेचे स्वप्न असलेल्या बौद्ध विहाराचे बांधकाम गतीने सुरू असून वर्षभरात काम पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासनही दिले. यावेळी कु. आरती मिणचेकर व कु. कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली.
प्रारंभी पंचायत समितीच्या प्रांगणात धम्म ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधान, भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची गारगोटी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ‘शिल्पकार संविधानाचे’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला.
यावेळी दलितमित्र पी.एस.कांबळे, एस.के.कांबळे, व्ही.जे.कदम, के.टी.कांबळे, आर.एस. कांबळे, नामदेवराव कांबळे, श्रीकांत कांबळे, बबन कांबळे, सुरेश जाधव, भिमराव धर्मवीर, जी.सी.कांबळे, बी.के.कांबळे, प्रा.दयानंद माने, सुशीलकुमार प्रज्ञावंत, पी.एस.कांबळे (आकुर्डे), विनोद कांबळे, एस.डी.कांबळे, बाळासाहेब कांबळे (बेगवडे), बाबुराव कांबळे, भीमराव धर्मवीर, श्रीकांत आकुर्डेकर, पांडुरंग कांबळे, सौ. गडकर, केरबा माने, रणजित कांबळे,, सचिन कांबळे, शिवाजी कांबळे, नारायण कांबळे, रविंद्र कांबळे यांच्यासह महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी स्वागत सौ.ज्योती थडके यांनी प्रास्ताविक मिलिंद पांगिरेकर यांनी वक्त्यांचा परिचय व्ही.जे.कदम यांनी तर आभार आर.एस. कांबळे यांनी मानले. तर सूत्रसंचलन गुलाब लांडगे यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
